नाशिक – मागील महिन्यात तीन आठवडे सातत्याने पाऊस झाला. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. द्राक्ष, डाळिंब, उन्हाळी कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीऐवजी कृषिमंत्र्यांकडून बेजबाबदार बोलणे सुरुच आहे. शेतकऱ्यांची तुलना कधी भिकाऱ्यांशी करतात. कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी म्हणतात. नेत्यांचे अपयश ते बोलून दाखवत आहेत. माणिक कोकाटे यांना मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

नाशिक येथे मंगळवारी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृषी खाते हे ओसाड गाव असेल तर त्याचे नंदनवन करण्याची जबाबदारी सरकारची असतांना त्यासाठी प्रयत्न होत नाहीत. अर्थ खाते असणाऱ्या अजित पवार यांनी कृषी खात्याला प्रोत्साहन दिले नाही. शेतकऱ्यांच्या दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत. सरकार बेजबाबदारपणे काम करत आहे. सातत्याने कांदा उत्पादकांना सापत्न वागणूक दिली जात आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची मागणी होत असली तरी परवानगी देऊ नये. उंची वाढविल्यास कोल्हापूर, सांगली, कराड, इचलकरंजी या शहरांना पुराचा फटका बसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. राज्य सरकारने हरकत घ्यायला हवी, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील नेत्यांनी काय करायचे ते करावे, फक्त महाराष्ट्राचे वाटोळे करु नये, असा टोलाही त्यांनी हाणला.

कमकुवत परराष्ट्र नीतीमुळे अपयश

ऑपरेशन सिंदूर वेळी भारताला कमी देशांनी पाठिंबा दिला. परराष्ट्र नीतीचे हे अपयश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात याआधी तणाव निर्माण होत असे, तेव्हा इतर देश भारताच्या बाजूने राहत असत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षे जग फिरून काय केले ? परराष्ट्र धोरण स्थिर नाही. चीन आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक युध्दात भारताला संधी होती. परंतु, ती साधता आली नाही, याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधले.