नाशिक – शहरातील वेगवेगळ्या भागातून दोन दिवसात सात दुचाकी चोरण्यात आल्या. याबाबत गुुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंचवटीतील आरटीओ भागात राहणारे आकाश सोनवणे यांनी सोसायटीच्या वाहनतळात उभी केलेली दुचाकी सोमवारी रात्री चोरीस गेली. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना पंचवटी महाविद्यालय परिसरात घडली. निर्मला महाले (रा.समर्थनगर, काॅलेजरोड) यांच्या तक्रारीनुसार पंचवटी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी उभी केलेली दुचाकी चोरण्यात आली. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना जुना गंगापूरनाका भागात घडली. राजेश धनवटे (रा.सरिता दर्शन सोसायटी, चोपडा लॉन्सशेजारी ) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार वसाहतीच्या वाहनतळ परिसरात उभी केलेली त्यांची दुचाकी चोरीस गेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दहीपूल भागात राहणारे सुभाष पेडियार (रा.सरस्वती लेन) यांची दुचाकी रात्री आँचल साडी दुकानासमोर उभी केलेली असतांना ती चोरण्यात आली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . शैलेश धांडे (रा. प्रभू प्रसाद सोसायटी, एचपीटी कॉलेज मागे, कॉलेजरोड) यांची दुचाकी रात्री वसाहतीच्या वाहनतळात उभी करण्यात आली असतांना चोरीस गेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इगतपुरी येथील भाऊसाहेब मते हे नाशिकमध्ये आले होेते. रात्री हॉटेल चांगलं-चुंगलं येथे जेवणासाठी गेले असता हॉटेलच्या वाहनतळात उभी केलेली त्यांची दुचाकी चोरण्यात आली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जेलरोड येथील राजेंद्र सानप (रा. जनार्दन स्वामी नगर, दसक) हे नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात गेले होते. परिसरातील स्टारप्लस मॉल भागात उभी केलेली त्यांची दुचाकी चोरण्यात आली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मागील काही वर्षातील वाहनचोरीचा वाढता आलेख पाहता चोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. चोरलेल्या दुचाकी तसेच अन्य वाहने ही इतर गुन्ह्यांमध्ये वापरली जात आहेत.

वाहन चोरी

२०२३ या वर्षात ८४०
२०२४ – ७६६
२०२५ – जानेवारी ते मे या पाच महिन्यात – ६०

शहर परिसरातील चोरीच्या दुचाकी शोधण्यासाठी वेळोवेळी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय चोरीच्या घटना ज्या ठिकाणी घडतात, तेथील सीसीटीव्हीतील चित्रणाच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास केला जात आहे. ३०० हून अधिक चोरीच्या घटना समोर असतांना त्यातील ३० टक्के गुन्ह्यांची उकल झाली आहे. चालु वर्षात चोरीच्या ९० दुचाकी पकडल्या आहेत. – प्रशांत बच्छाव (पोलीस उपायुक्त).