महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून कामकाजात होणाऱ्या त्रुटींची अनेकदा चर्चा होत असते. परंतु, विजेचा वापर न करताही शेतकऱ्याला २८ हजार २७० रुपयांचे देयक आले आहे. हे देयक २०१५ नंतर आलेले असून मीटरमधील नोंदी करण्यासाठी आजवर एकदाही वीज कर्मचारी आला नसल्याचा दावा शेतकऱ्याच्या कुटूंबियांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नाशिक : कृषी सेवा केंद्रात घरफोडी

इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील सोमा भस्मे यांना शेतातील कामासाठी विजेची गरज असल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे २०१३ मध्ये अर्ज केला होता. वीज जोडणी झाली. परंतु, आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शेतात वीजपंप बसविता आला नाही. दरम्यान, सोमा यांचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर हा विषय मागे पडला. वीज जोडणी झाल्यानंतर रिडींग नोंदणीसाठी एकदाही वीज कर्मचारी आला नाही. त्यामुळे विजेचा वापर झाला नसल्याचा दावा भस्मे कुटूंबातील सदस्य करत आहेत. असे असतांना भस्मे कुटूंबियांना वीज वितरण कंपनीकडून २८ हजार २७० रुपये देयक प्राप्त झाले. हे देयक रद्द करण्याची मागणी करत भस्मे कुटूंबियांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधला असता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Payment of 28 thousand rupees to the farmer in the absence of electricity consumption amy