नाशिक : राज्य सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी आदिवासी शेतकरी, शेतमजुरांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाची घेराबंदी अधिक भक्कम करत अधिकारी आणि नागरिकांचा प्रवेश रोखला. यामुळे या कार्यालयात प्रवेश करणे अवघड झाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हा न्यायालयाच्या बाजूकडील लहानशा प्रवेशद्वारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुसरीकडे काही आंदोलकांनी सीबीएस चौकात ठिय्या देत वाहतूक बंद पाडली. या घटनाक्रमाने पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली.

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, कांदा निर्यात सर्व देशात खुली करावी, यांसह विविध मागण्यांविषयी मुंबईतील बैठकीत नेहमीप्रमाणे केवळ आश्वासने दिली गेल्याने माकप आणि किसान सभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असणारे आंदोलन यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे. राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात मंगळवारी मुंबईत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी सकाळपासून आंदोलक अधिक आक्रमक झाले. महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत प्रवेशाला विरोध केला. सोमवारपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. प्रारंभीचे दोन दिवस आंदोलकांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात ये-जा करण्यास विरोध केला नव्हता. आसपासच्या शाळा व आस्थापनांना आंदोलनामुळे अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेतली होती. बुधवारी मात्र मुख्यत्वे जिल्हाधिकारी कार्यालयाची कोंडी करण्यात आली. तीन दिवसांपासून अधिकारी वर्गाला आपली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नेता आलेली नाहीत.

हेही वाचा…धुळे : अधिकाऱ्यांच्या तोंडी परीक्षेत मुख्याध्यापकच नापास, मग…

जिल्हाधिकारी कार्यालयालगत जिल्हा न्यायालय आहे. उभयतांच्या संरक्षक भिंतीत ये-जा करण्यास एक लहानसे प्रवेशद्वार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या त्याच मार्गाचा वापर करावा लागत आहे. महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावर ठाण मांडले असताना काही आंदोलक लगतच्या सीबीएस चौकात धडकले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या देत वाहतूक बंद पाडली. शहरातील हा मुख्य चौक आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल झाले. आंदोलकांचा गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांनी कोंडीत अडकलेल्या बसमधून प्रवाश्यांना उतरवून पायी निघून जाण्यास सांगितले. आंदोलकांनी सीबीएस ते अशोक स्तंभ दरम्यान ठिय्या दिला असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन दिवसांपासून बंद आहे. पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण आला आहे. प्रारंभीचे दोन दिवस शांततेने चाललेले आंदोलन हळूहळू तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे.