-
महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी मोदींना सांगितलं.
-
राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असं पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
-
पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असंही पवार म्हणाले.
-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
-
संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते भाजपवर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीचे अलिबागमधील भूखंड व दादरमधील सदनिका ईडीने जप्त केली आहे.
-
दरम्यान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांनी संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांसोबत चर्चेस नेल्याने भुवया उंचावल्या आहेत. “शरद पवारांनी इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
-
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत”.
-
इम्तियाज जलील यांनी केलेल्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “काहीजण अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पद्धतीने पसरवून विपर्यास करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत”.
-
दुसरीकडे संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांची पाठराखण केल्याबद्दल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ईडी जर भाजपाची बटीक नसेल तर याप्रकरणी कारवाई करावी असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं असून हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचं म्हटलं.
-
यावेळी त्यांना शरद पवारांनी मोदींकडे कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “फक्त माझा मुद्दा नाही. शरद पवार पित्यासमान असून त्यांनी पंतप्रधानांकडे मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल मी आभारी आहे”.
-
मात्र नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल इम्तियाज जलील यांनी टीका केल्यासंबंधी बोलताना ते काहीही बोलू शकतात असं राऊत म्हणाले.
-
“आयएनएस विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना यांच्याशी खेळ करुन, बलिदानाचा आणि मातृभूमीचा लिलाव करुन बाजार मांडणारे भाजपाचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील सोमय्या यांच्या राष्ट्रद्रोही भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढलं. इतकं होऊनही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटतं. राष्ट्रभक्तीवर गाणी गातात, भाषणं देतात. दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व शिकवतात…पण काल ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची वकिली करण्याचा प्रयत्न केला ते पाहून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, हेगडेवार आणि आजचे मोहन भागवत यांचा जीव तीळतीळ तुटला असेल. अटलजी वैगेरे तर सोडून द्या,” अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली.
-
“काल ते म्हणाले की आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे. तुम्ही काय उपटलं ते सांगा. तुमचं या देशासाठी काय योगदान आहे. उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन पैसे गोळा करत आहात. कधी राम मंदिराच्या नावे, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलेत. महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान असून त्यातून पैसे गोळा केला. आणि त्या भयंकर अशा भ्रष्ट गुन्हेगाराची बाजून घेऊन त्याची वकिली करता,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
-
-
पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी अभ्यासाशिवाय, पुराव्याशिवाय बोलत नाही म्हणता. मग काय पुरावा आहे तुमच्याकडे? राजभवन तुमचंच असून त्यांनीच पुरावा दिला आहे”. शिवसेनेतर्फे आज राज्यसभा आणि लोकसभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती यावेळी संजय राऊतांनी दिली.
-
आयएनस विक्रांत जरी या लोकांनी भंगारात घालवली असली तरी त्या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावे भ्रष्टाचार करणारे हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष बुडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही,” असंही ते म्हणाले.
-
“आमच्यावर पाठीमागून कितीही वार केले, खंजीर खुपसला तरी शिवसेनेचं मनोबल खचलेलं नाही. भाजपाचे भ्रष्ट्राचारी जातील तिथे जोडे मारल्याशिवाय लोक राहणार नाहीत. महाराष्ट्र सर्व काही खपवून घेईल, पण देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पीडिजात धंदा, वारसा आहे. देशाच्या संरक्षणासंदर्भात महाराष्ट्रात कोणी गद्दार असेल तर त्याला याच मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही,” असंही ते म्हणाले,
-
“७११ मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरण्यात आले. मुंलुंडच्या कार्यालयात हे बॉक्स ठेवण्यात आले. काही बॉक्स फोडण्यात आले. त्या पैशांची बंडलं बांधण्यासाठी कार्यकर्ते बोलवण्यात आले. ते पैसे पीएमसी बँकेतून पैसे वळवण्यात आले. काही बॉक्स हे सोमय्यांच्या बिल्डर मित्राच्या कार्यालायत ठेवण्यात आले. हा मनी लाँड्रिंगचा प्रकार होऊ शकतो. पीएमएलए कायदा लागू शकतो. ईडी नावाची संस्था भाजपाची बटीक नसेल तर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही,” असंही राऊत म्हणाले.
-
(File Photos)
ईडी कारवाईचा मुद्दा शरद पवारांनी मोदींकडे उपस्थित केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले; “ते पित्यासमान…”
महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
Web Title: Shivsena sanjay raut on ed ncp sharad pawar pm narendra modi sgy