-
औरंगाबादमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मे रोजी सभा घेणार आहेत.
-
मात्र यापूर्वीच शहरातील सुभेदारी विश्रामगृहात इतिहास संशोधक व प्रख्यात वक्ते डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी राज यांच्यावर निशाणा साधलाय.
-
कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंवर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरुन निशाणा साधलाय.
-
यावेळी बोलताना कोकाटे यांनी ‘राज ठाकरे हे पुरंदरेंचं समर्थन करत असल्याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्यात त्यांचा सुद्धा सहभाग आहे’, ‘पुरंदरेंनी चुकीचा इतिहास लिहून घृणास्पद काम केलं आहे’, ‘राज ठाकरेंना आमचा विरोध कायम राहील’, ‘पुरंदरेच खरे जेम्स लेन आहेत’ अशी वक्तव्य करत राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधलाय.
-
“राज ठाकरे हे सातत्याने बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करत असतात. हे आक्षेपार्ह आणि निंदाजनक आहे,” असं कोकाटे म्हणालेत.
-
“राज यांच्या पुरंदरे समर्थनाची चिंता असण्याचं कारण असं की बाबासाहेब पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचं चरित्रहनन केलेलं आहे,” असा आरोप कोकाटे यांनी यावेळी बोलताना केलाय.
-
“पुरंदरेंनी बदनामीकारक मजकूर लिहिलेला आहे. तो जेम्स लेन आला आणि बदनामी करुन गेला, असं एक दोन दिवसांमध्ये घडलेलं नाही तर पुरंदरेंनी सातत्याने त्यांच्या पुस्तकांमध्ये शहाजी महाराज हजर असतानाच गैरहजर दाखवणं, तसेच दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, मार्गदर्शक आणि शिक्षक नसताना, त्यांना सतत सोबत दाखवण्याचं अत्यंत घृणास्पद काम पुरंदरेंनी केलेलं आहे केलं आहे,” अशी टीका कोकाटे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केली.
-
“याच पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा घोळ घातलेला होता,” असंही कोकाटे म्हणालेत.
-
“याच पुरंदरेंनी सोलापूरच्या जनता बँक व्याख्यानमालेमध्ये जेम्स लेनच्या पुस्तकाचं कौतुक केलं होतं,” असंही कोकाटे म्हणाले आहेत.
-
“पुरंदरेंनी पुस्तक आणि लेखकाचं कौतुक केल्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ झाला आणि त्यातून भांडारकर संस्थेवरती कारवाई झाली,” असं कोकाटे म्हणालेत.
-
“भांडारकर संस्थेवर कारवाई होण्यापूर्वी पुण्यातील शिवप्रेमींनी जेम्स लेनसोबतच्या एका पुस्तकाचे सहलेखक असणाऱ्या श्रीकांत बहुलकरांना काळं फासलं होतं. त्या श्रीकांत बहुलकारांच्या घरी जाऊन राज ठाकरेंनी बहुलकरांची माफी मागितली होती,” अशी आठवण कोकाटेंनी सांगितली.
-
“राज यांनी बहुलकरांची माफी मागितली म्हणजे शिवरायांची बदनामी करणाऱ्या लेनला मदत करणाऱ्यांना राज ठाकरेंनी मदत केली आहे,” असा दावा कोकाटेंनी केलाय.
-
“राज ठाकरे सुद्धा शिवरायांच्या बदनामीच्या कटामधील एक व्यक्ती आहे. जो व्यक्ती शिवरायांच्या बदनामीच्या कटामध्ये सहभागी आहे, जो व्यक्ती सातत्याने पुरंदरेंचं समर्थन करतो,” अशी टीका कोकाटे यांनी राज ठाकरेंवर केलीय.
-
“हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही असं तुम्हाला वाटतं का?”, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर उत्तर देताना, “त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घ्यावा की नाही याबद्दल आमचं काही मत नाही,” असं कोकाटे म्हणाले.
-
“भारतीय लोकशाहीने प्रत्येकाला आपआपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. संविधानानेच सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीला आपआपल्या धर्मानुसार वागण्याचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे. तो राज ठाकरेंना देखील आहे,” असंही कोकाटेंनी म्हटलं.
-
“पण याचा अर्थ महापुरुषांचं चरित्रहनन करणं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं स्वातंत्र्य राज ठाकरेंना दिलं कोणी?”, असा प्रश्न कोकाटेंनी उपस्थित केला.
-
“गेल्या १५ वर्षांपासून आमची त्यांच्याविरोधात भूमिका आहे. जेव्हा भंडारकर प्रकरण घडलं तेव्हा आमची राज ठाकरेंविरोधात भूमिका होती,” असं कोकाटे म्हणालेत.
-
“त्यानंतर दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुणे महानगरपालिकेने हटवला होता तेव्हा राज ठाकरेंनी पुतळ्याचं समर्थन केलं होतं. तेव्हा देखील आम्ही राज यांच्याविरोधात भूमिका मांडलेली,” अशी आठवण कोकाटेंनी करुन दिलीय.
-
“२०१४ ला आम्ही त्यांच्याविरोधात होतो. अगदी २०१९ ला ते काँग्रेस, राष्ट्रवादीला पुरक भूमिका घेत होते तेव्हा महाराष्ट्राच्या बड्या नेत्याचा मला निरोप आला राज ठाकरेंच्याविरोधात तुम्ही भूमिका घेऊ नका. तरी आम्ही राज ठाकरेंविरोधात २०१९ ला भूमिका घेतली,” असंही कोकाटे म्हणाले.
-
“केवळ औरंगाबादला सभा आहे म्हणून आमचा विरोध आहे असं नाही, कायम आमचा राज ठाकरेंना विरोध राहील,” असंही यावेळी कोकाटे म्हणाले.
-
“राज ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या या हिंदुत्वाकडे तुम्ही कसं बघता,” असा प्रश्नही यावेळी पत्रकारांनी कोकाटेंना विचारला.
-
त्यावर बोलताना कोकाटे यांनी, “राज ठाकरेंच्या सभेला एवढी गर्दी असते तर त्याचं मतांमध्ये का रुपांतर होत नाही. अनेक लोक मनोरंजन आणि करमणूक म्हणून त्यांच्या सभेला जातात,” असा टोला लगावला.
-
“राज यांनी राजकीय दृष्ट्या मोठं व्हावं की लहान व्हावं, त्यांना विजय मिळावा की पराभव व्हावा याबद्दलचं राजकीय भाष्य मी करणार नाही फक्त ते छत्रपती शिवाजी राजेंची बदनामी करणाऱ्यांचं समर्थन करतात याला आमचा विरोध आहे,” असं कोकाटे यांनी स्पष्ट केलं.
-
“पुरंदरेच खरे जेम्स लेन आहेत ही इथल्या अभ्यासकांची, विचारवंताची भूमिका आहे,” असंही कोकाटे म्हणालेत.
-
“म्हणूनच शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंचं समर्थन कराणारे राज ठाकरे अनेकदा तोंडावर आपटलेले आहेत,” असंही कोकाटे म्हणालेत.
-
“राज आणखीन सुद्धा आपटणार आहेत हे लक्षात ठेवा. राज ठाकरेंनी थोडं आत्मचिंतन करावं,” असा सल्ला कोकाटेंनी दिलाय.
-
“राज ठाकरेंना कोणीतरी समजून सांगावं की तुमच्या पक्षाचे १३ आमदार होते. आज किती आहे एक आहे. त्याची अनेक कारणं आहेत,” असा टोला कोकाटे यांनी लगावलाय.
-
“मला राजकीय भाष्य करायचं नाहीय पण त्यामागील महत्वाचं कारण म्हणजे ठाकरे जे पुरंदरेंचं समर्थन करतात त्यामुळे त्याचं राजकीय अध:पतन झालेलं आहे,” असा टोला कोकाटेंनी लगावलाय.
-
“राज ठाकरेंची विश्वासार्हता संपलेली आहे. म्हणून राज ठाकरेंना आम्ही इशारा देतोय की पुरंदरेंचं तुम्ही समर्थन करत असाल तर तुम्हाला आमचा विरोध कायम राहील,” असंही कोकाटे म्हणाले आहेत.
-
“राज ठाकरे तुम्ही पुरंदरेंचं समर्थन करता म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवाजी राजेंच्या बदनामीचं समर्थन करत आहात,” असं कोकाटे म्हणालेत.
-
“राज ठाकरे तुम्ही माफी मागा अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही,” असा इशाराही कोकाटेंनी राज यांना दिलाय.
-
तसेच पुढे बोलताना, “जर राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेतात तर शिवाजी महाराज हिंदू नव्हते का? राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून जिजाऊ हिंदू नाहीत का?,” असा थेट सवाल कोकाटे यांनी राज ठाकरेंना केलाय.
-
“हिंदूच्या महापुरुषांची बदनामी होत असताना त्या बदनामी करणाऱ्याचं ठाकरे समर्थन कसं काय करतात? त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हे बसतं का?,” असंही कोकाटे यांनी विचारलं आहे.
-
“एकदा राज ठाकरेंनी वा. सी. बेंद्रे, सेतुमाधव पगडी, कृष्णाजी अर्जून केळूसकर, त्र्यंबक शंकर शेजवलकर एवढचं काय प्रबोधनकारांची पुस्तकं वाचावीत. मग ते जे काय पुरंदरेंच्या भक्तीत अडकलेले आहेत त्यातून ते बाहेर पडतील,” असा टोला कोकाटेंनी लागवला. (सर्व फाइल फोटो)
“राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून जिजाऊ हिंदू नाहीत का?; छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरे…”
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आलीय.
Web Title: Historian shrimant kokate slams raj thackeray scsg