-
देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फारसे सख्य नसल्याने आणि दुसऱ्यांदा ब्राह्मण मुख्यमंत्री होऊ नये हे मुद्दे फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता कापला जाण्यामागे होतेच.
-
पण या राजकीय मुद्द्यांबरोबरच कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यामुळेही फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा पत्ता अचानकपणे कापला गेला असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ सांगितले.
-
शिवसेनेतील फुटीप्रकरणी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय पीठापुढे बुधवारी सुमारे दीड तास युक्तिवाद झाले.
-
या ३९ आमदारांचे वर्तन हे पक्ष सोडल्याचेच निदर्शक असल्याने राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टातील तरतुदींनुसार त्यांना अपात्र ठरवावे, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
-
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी शिंदे गटातर्फे युक्तिवाद करताना म्हणाले, हा संघर्ष पक्षांतरबंदी कायद्यात मोडतच नसून या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, हा केवळ पक्षांतर्गत वाद असल्याचा युक्तिवाद केला.
-
जर एखाद्या राजकीय पक्षातील आमदार मुख्यमंत्री वेळ देत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत समाधानी नाहीत, तर त्यांना पक्षांतर्गत लोकशाहीनुसार बहुमताने आपला नेता बदलण्याचा हक्क आहे.
-
या आमदारांनीही तेच केले असून हा पक्षांतर्गत वाद असल्याने आणि आम्ही शिवसेनेतच असल्याचे त्यांचे म्हणणे असल्याने या प्रकरणी पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकणार नाही.
-
काँग्रेसमध्ये १९६९ मध्ये झालेल्या फुटीचे उदाहरणही साळवे यांनी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान दिले.
-
त्याचबरोबर उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार सत्तेवर आले आणि ठाकरे बहुमत चाचणीस सामोरे गेले नाहीत, याचाच अर्थ त्यांच्यामागे पक्षांतर्गत बहुमत नव्हते, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला.
-
त्यामुळे शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांनी बहुमताने पक्षांतर्गत निर्णय घेतले, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी शिंदे गटातर्फे केला.
-
त्यामुळे राज्यातील सत्तापालट हा केवळ शिवसेनेतील पक्षांतर्गत वाद आहे, हे सिध्द करण्यासाठी शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आल्याची शक्यता आहे.
-
जर भाजपाने फडणवीस किंवा अन्य भाजपा नेत्याला मुख्यमंत्रीपद दिले असते, तर शिंदे गटाने पक्षातून फुटून भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे, असे चित्र निर्माण झाले असते.
-
त्यातून पक्षांतरबंदी कायद्यानुसारही एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार अडचणीत येऊ शकले असते.
-
पण आता मुख्यमंत्री शिवसेनेचेच एकनाथ शिंदे असल्याने आणि जनतेवर निवडणुका लादल्या जाऊ नयेत, यासाठी भाजपाने शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे.
-
मंत्रिमंडळ विस्तारास न्यायालयाने स्थगिती दिली नसताना आणि भाजप-शिंदे गटातील मंत्रीपद व खातेवाटप झाल्याचा दावा उभयपक्षी केला जात आहे.
-
मात्र भाजपा पक्षश्रेष्ठी विस्तारास हिरवा कंदील दाखवत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचे समजते.
-
पक्षश्रेष्ठी कायदेशीर अडथळे दूर होण्याची वाट पाहात असावेत आणि ते दूर झाल्यावर त्याचे काही काळात ‘राजकीय पडसाद’ही उमटतील, हे कारण असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
-
न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या या खटल्याची सुनावणी आत ८ ऑगस्टर रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी देवेंद्र फडणवीस आपली सर्व कामं रद्द करुन तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. याच खटल्यासंदर्भात सल्ला मसलत करण्यासाठी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
-
तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांना डॉक्टरांनी थकवा असल्याचं सांगताना सक्तीचा आराम करावा असा सल्ला दिल्याने शिंदे यांनीही आज सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
