-
पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. (राज ठाकरेंचे सर्व फोटो : अमित चक्रवर्ती, एक्सप्रेस फोटो यांच्याकडून)
-
“माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं राज यांनी म्हटलं आहे.
-
राज यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट केली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
-
पुण्यातील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात एनआयएने केलेल्या कारवाईला विरोध करण्यासाठी शुक्रवारी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाच्या आधीच पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर इथे मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळीच या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी केली. पोलीस काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असतानाच रस्त्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणाबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली. ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणाही या आंदोलकांनी दिल्या.
-
याच पार्श्वभूमीवर राज यांनी अगदी कठोर शब्दांमध्ये आपल्या रागाला वाट मोकळी करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी अगदी हिंदू बांधवांपासून महाराष्ट्रातील मराठे आणि सणासुदीचाही उल्लेख केलाय. राज यांच्या पोस्टमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आलेत पाहूयात…
-
“एएनआयने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने यांना वेळीच ठेचलं पाहिजे” असं राज यांनी पोस्टच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.
-
“ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी,” अशी आठवण राज यांनी आंदोलनकर्त्यांना करुन दिली आहे.
-
“तरीही या देशद्रोह्यांचं समर्थक करत जर या पीएफआयच्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा,” असं राज यांनी सुनावलं आहे.
-
“ही थेर आमच्या देशात चालणार नाहीत,” असा इशाराही राज यांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना दिला आहे.
-
“माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही” असंही राज यांनी म्हटलं आहे.
-
“नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत,” असंही राज यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
-
“भारतातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहाट्यांच्या मुठी जर आवळल्या तर या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका,” अशा जळजळीत शब्दांमध्ये राज यांनी इशारा दिला आहे.
-
“या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल” असं सूचक विधान राज यांनी केलं आहे.
-
“त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच भारताचं हित आहे,” असं पत्राच्या शेवटी राज यांनी म्हटलं आहे.
-
राज यांनी ट्वीटरवरुन केलेली ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
-
राज यांनी सायंकाळच्या सुमारास आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन ही पोस्ट केली आहे.
-
ही पाहा राज यांची संपूर्ण पोस्ट जशीच्या तशी.
-
राज यांनी या पोस्टमध्ये भारताचा उल्लेख हिंदूस्तान असा केला आहे.
-
आता राज यांच्या या भूमिकेवर कोणते पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज ठाकरेंनी केली एक विनंती
Web Title: Mns chief raj thackeray reacts on pakistan zindabad slogan in pune request amit shah devendra fadnavis to take action scsg