-
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणांनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली असून, शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात असा टोला लगावला आहे.
-
कृषी विभागाच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यातील भाषणांवर प्रतिक्रिया दिली.
-
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच भाषण आपण ऐकलं का? असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण दोन्ही भाषणं ऐकली नसल्याचं सांगितलं.
-
“मी दोन्ही भाषणं ऐकली नाहीत. मी नागपूरमध्ये त्यावेळी धम्म प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. मात्र त्यानंतर दोन्ही भाषणांचा सारांश माझ्यापर्यंत पोहोचला. रात्री उशिरा शिंदेंचं भाषण पाहिलं आहे. उद्धव ठाकरे यांचा जो काही मेळावा झाला, त्यावर मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही. शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते. तसंच शिमग्याच्या पलीकडे त्या मेळाव्यात काहीच नव्हतं,” असं फडणवीस म्हणाले.
-
“पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अभिनंदन करेन. खरी शिवसेना कोणाची हे त्यांनी दाखवून दिलं आहे. शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट क्षमता बीकेसी मैदानाची आहे आणि ते तुडुंब भरलेल होतं,” असंही ते म्हणाले.
-
खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे कालच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये दिसले आहे. राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भगवाच फडकणार असून, तो भगवा हा भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा असेल, असे वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
-
फडणवीस म्हणाले, ‘दसऱ्या मेळाव्यामध्ये शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेसाठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री शिंदे हे सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला आले होते. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भगवाच फडकणार असून, तो भगवा भाजप आणि शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेचा असेल.
-
“शिवसेनेच्या सगळ्या फुटीचं मुख्य कारणच हे आहे की मूळ शिवसेनेचा विचार बाजूला टाकून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा विचार स्वीकारला. तसं आचरण स्वीकारलं. ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटाशी संबंध आहेत, जे सावरकरांना रोज शिव्या देतात अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. म्हणूनच त्यांच्यावर ही वेळ आली”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुखांचेच भाषण करीत असत’ असंही फडणवीस म्हणाले.
-
एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
-
“असं जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
-
(File Photos)
तुम्ही कोणाचं भाषण ऐकलंत? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “कोणाचंच नाही, कारण…”
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुखांचेच भाषण करीत असत, फडणवीसांचा टोला
Web Title: Bjp devendra fadnavis dasara melava 2022 cm eknath shinde bkc shivsena uddhav thackeray shivaji park sgy