मुंबई : कमळफुले, हार, पुष्पगुच्छांचा खच, शाली आणि अभिवादनाचे हजारो हात, त्यासोबत भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष, ही प्रचारफेरी की विजययात्रा भासावी असे उत्साही वातावरण.. केंद्रीय वाणिज्यमंत्री आणि उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांच्या नमो प्रचारफेरीत दिसणारे हे दररोजचेच चित्र.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारकोप विधानसभा क्षेत्रातील बंदरपाखाडी गाव, गौरव गार्डन ते वीर सावरकर चौक या मार्गाने गोयल यांची प्रचारफेरी गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निघाली. रस्त्याने दुतर्फा अभिवादन व शुभेच्छा देण्यासाठी नागरिक उभे होते. घरांच्या बाल्कनी, सज्जे, खिडक्यांमधून आबालवृद्ध डोकावत या प्रचारफेरीचे चित्रीकरणही करीत होते. वाटेत गणेशमंदिर लागले. तेथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खाली उतरून मंदिरात येण्याचा आग्रह केला. पण धार्मिकस्थळी प्रचार करता येणार नाही, या नियमाची माहिती देत गोयल यांनी मंडळाकडून शाल व पुष्पगुच्छ स्वीकारला. पुढे चौकाचौकात हेच चित्र दिसत होते.

हेही वाचा : भाजपाला समर्थन देणारे आणखी १० आमदार काँग्रेसच्या संपर्कात? हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काय म्हणाले?

आतापर्यंत राज्यसभेवर निवडून गेलेल्या गोयल यांची लोकसभेची ही पहिलीच निवडणूक. जनसामान्यांशी संवाद साधून मतदारसंघ पिंजून काढणे, हे आवश्यक असते. भाजपच्या पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्याने निवडणूक कार्यालय सुरू करून गेल्या दीड महिन्यापासून गोयल यांनी प्रचारही सुरू केला आहे. भर उन्हात सभा, भाषणे व प्रचारफेऱ्या पार पाडत असताना गोयल यांचा घसा गुरूवारी सायंकाळी पूर्ण बसल्याने आवाजही फुटत नव्हता. तरी पण थोडे लिंबू-पाणी घेत गोयल हे मोठ्या उत्साहाने सर्वांशी संवाद साधत होते. खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मिलींद देवरा, आमदार योगेश सागर यांच्यासह घटकपक्षांचे पदाधिकारी गोयल यांच्या समवेत प्रचाररथावर होते.

गोयल यांनी सकाळी मालाड (पश्चिम) येथे मूव्ही टाइम सिनेमापासून प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधताना कॉँग्रेसच्या संकुचित धोरणावर व परिवाराच्या राजकारणावर टीका करीत मोदी यांच्यासाठी देश हाच परिवार असल्याचे संगितले आणि सरकारच्या अनेक लोकोपयोगी निर्णयांची माहिती दिली. सर्वसमावेशक विकासासाठी वचनबद्ध असल्याचे नमूद करीत त्यांनी उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करणार असल्याची ग्वाही लिबर्टी गार्डन पर्यंत काढलेल्या प्रचारफेरीत दिली.

हेही वाचा : हरियाणात सरकार अल्पमतात येऊनही भाजपा एवढी निर्धास्त का?

हिरे व्यापारात उज्वल भवितव्य

गोयल यांनी दुपारच्या वेळेत हिरे व्यावसायिकांशीही बीकेसी येथे भारत डायमंड बोर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘मतदान आपले कर्तव्य आहे’ या विषयावर साधला. जागतिक हिरे बाजारपेठेत भारताचे भवितव्य उज्ज्वल असून या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्याचा आराखडा मोदी यांनी तयार केला असल्याचे त्यांनी नमूद केले आणि कारागिरांच्या समस्यांवरही ऊहापोह केला.

हिरे व्यावसायिक व कामगारांशी संवाद साधल्यावर गोयल यांनी खासदार मिलिंद देवरा यांच्यासमवेत तडक वांद्रे रेल्वेस्थानक गाठले आणि बोरीवलीसाठी लोकल प्रवास सुरू केला. गाडीला थोडी गर्दी असल्याने बसण्यासाठी जागा नव्हती. तेव्हा गोयल व देवरा यांनी उभ्यानेच डब्यामध्ये फिरत प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि प्रवाशांबरोबर सेल्फीही काढल्या.

हेही वाचा : गांधी घराण्याचे सेवक ते सोनिया गांधींचे स्वीय सहाय्यक; स्मृती इराणींना अमेठीतील काँग्रेस उमेदवाराने दिले उत्तर

सकाळी साडेआठ-नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ-साडेनऊ अशा विधानसभानिहाय प्रचारफेऱ्यांचे नियोजन आणि दुपारच्या वेळेत पदाधिकाऱ्यांच्या बैठका व अन्य कार्यक्रम असे गोयल यांचे सध्याचे व्यस्त वेळापत्रक आहे. गेले दीड महिना प्रचारास मिळाल्याने संपूर्ण मतदारसंघात एक टप्पा जवळपास पूर्ण झाला असून नागरिकांचा उत्साह अभूतपूर्व असल्याचे गोयल यांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचेच, असे नागरिकांनी ठरविले असल्याने दररोजच्या प्रचारफेऱ्यांना उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. विक्रमी मताधिक्याने विजयी होईन, असा विश्वासही गोयल यांना आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader piyush goyal contesting from mumbai north lok sabha constituency print politics news css