आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देशम आणि जनासेना पार्टीबरोबर युतीचा निर्णय झाल्यावर ओडिशामध्ये नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाबरोबर जागावाटपाची चर्चा सुरू झाल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या भाजपला प्रादेशिक पक्षांबरोबर युतीची आवश्यकता का भासते, असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंध्रमध्ये भाजपने चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम व सुपरस्टार पवन कल्याण यांच्या जनासेना पक्षाबरोबर युतीची घोषणा केली. यापाठोपाठ ओडिशामध्ये बिजू जनता दलाबरोबर युतीच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. गेल्याच महिन्यात बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशी भाजपने पुन्हा हातमिळवणी केली. कर्नाटकात माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर युती केली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आसाममध्ये आसाम गण परिषद व अन्य छोटे पक्ष, ईशान्य भारतात विविध स्थानिक पक्षांबरोबर भाजपची युती आहे. उत्तर प्रदेशमध्ये छोट्या पक्षांना बरोबर घेण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात छोट्या पक्षांच्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली.

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाजपला विजयाची एवढी खात्री असताना प्रादेशिक पक्षांची गरज का भासावी ? आंध्र प्रदेशात भाजपची ताकद मर्यादित आहे. यामुळे तेलुगू देशम आणि जनासेना पार्टी युतीची मदत मिळणार असल्यास भाजपला ते हवेच आहे. आंध्रमध्ये चंद्राबाबू नायडू हे कम्मा या उच्चवर्णीय जातीचे आहेत तर जनासेना पार्टीचे पवन कल्याण हे कप्पू या मागास गणल्या जाणाऱ्या जातीचे आहेत. आंध्रमध्ये कम्मा आणि कप्पू या दोन जाती परस्परांच्या प्रतिस्पर्धी मानल्या जातात. यामुळेच नायडू आणि पवन कल्याण एकत्र आले तरी दोन्ही समाजांची मते परस्परांमध्ये हस्तांतरित होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. आंध्रमधील २५ पैकी जास्तीत जास्त जागा एनडीएच्या घटक पक्षांनी जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

ओडिशामध्ये भाजपने बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. काँग्रेस कमकुवत झाल्याने विरोधकांची जागा घेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. नवीन पटनायक यांचे एकखांबी नेतृत्व असेपर्यंत भाजपला तेथे सत्तेचा सोपान गाठणे कठीण वाटते. यामुळेच बहुधा भाजपने बिजू जनता दलाशी हातमिळवणी करण्यावर भर दिला असावा. नवीन पटनायक हे आता थकले आहेत. २०२४ नाही पण २०२९ मध्ये ओडिशामध्ये प्रस्थापित होण्याचा भाजपचा प्रयत्न असावा.

हेही वाचा – कोल्हापुरात शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण ?

बिहारमधील ४० लोकसभेच्या जागा डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने पुन्हा नितीशकुमार यांच्याशी जुळवून घेतले. नितीश आणि भाजप युतीचा कितपत प्रभाव पडतो हे महत्त्वाचे आहे. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. यामुळेच लालू किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे बोलले जाते.

स्वबळावर ३७० जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. याबरोबर मित्र पक्षांच्या मदतीने ४०० जागांचा पल्ला पार करायचा आहे. भाजप एवढे मित्र पक्ष का जमवत आहे, असा सवाल त्यातून उपस्थित होतो. भाजपला यशाची खात्री नाही का, असा खोकच प्रश्न काँग्रेसकडून केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp lok sabha seats why did the bjp feel the need for the friendship of regional parties print politics news ssb