सौरभ कुलश्रेष्ठ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्मरण पत्रे दिल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून दानवे यांना बंगला मंजूर झालेला नसताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानासह नंदनवन- अग्रदूत आणि आता त्यांच्या गटाच्या विधिमंडळ पक्षाच्या कामासाठी मंत्रालयासमोरील ब्रह्मगिरी असे एकूण चार बंगले असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने चार-चार बंगले आपल्या ताब्यात ठेवल्याचा इतिहास नाही.

हेही वाचा… शिवसेना, ढाल तलवार आणि माने घराणे ; दोन तपानंतर पुन्हा जोडले नाते

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी स्वीकारली. विरोधी पक्ष नेत्यांना शासकीय बंगल्यासह अधिकारी कर्मचारी वर्ग व इतर प्रशासकीय संसाधने पुरवली जातात. मात्र आता तीन महिने उलटत आले तरी अंबादास दानवे यांना शिंदे फडणवीस सरकारने बंगला मंजूर केलेला नाही. अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक स्मरणपत्रे पाठवूनही त्याचा उपयोग झालेला नाही. सत्ताधारी- विरोधक संघर्ष या पातळीपर्यंत खाली गेल्याचे आतापर्यंत घडलेले नाही.

हेही वाचा… शिरूर लोकसभा मतदार संघाच्या बैठकीला विद्यमान लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही?

आश्चर्याची बाब म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांना एक बंगला देण्यास टाळाटाळ होत असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तब्बल चार बंगले आहेत. मुख्यमंत्र्यांना वर्षा हे अधिकृत शासकीय निवासस्थान दिले जाते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा बंगला आहे. पण त्याच वेळी नगर विकास मंत्री या नात्याने त्यांना मिळालेला नंदनवन बंगला एकनाथ शिंदे यांनी न सोडता आपल्याच ताब्यात ठेवला आहे. इतकेच नव्हे तर नगर विकास मंत्री असतानाच नंदनवन बंगल्या शेजारील अग्रदूत बंगलाही त्यांनी जोडून घेतला होता. त्यानंतर आता आपल्या गटाच्या विधिमंडळ पक्षाच्या कामकाजासाठी मंत्रालयासमोरील ब्रह्मगिरी हा बंगलाही शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे वर्षा बरोबरच नंदनवन-अग्रदूत, ब्रह्मगिरी अशा एकूण चार बंगल्यांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय काम करत आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना एक बंगला देणे टाळले जाते अशी चर्चा मंत्रालयात सुरू झाली आहे.

हेही वाचा… विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

हेही वाचा… चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?

अडीच वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयासमोरील बंगल्याऐवजी मलबार हिलवरील सागर हा बंगला मागितला. त्यावेळी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने फडणवीस यांना तो बंगला दिला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आलेल्या अजित पवार यांनी आपल्याकडील देवगिरी बंगला कायम ठेवण्याची विनंती सरकारला केली. तीही शिंदे फडणवीस सरकारने लागलीच मान्य केली. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांना बंगला देण्यात केली जाणारी राजकीय चर्चेचा विषय झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm possessing four bungalow and still bungalow was denied to opposition leader since three months print politics news asj