कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांना मिळालेल्या जादाच्या उत्पन्नाकडे लक्ष वेधत कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांपूर्वी शेतकऱ्यांना प्रति टन ५०० रुपये द्यावेत अशी मागणी लावून धरली आहे. आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच या माध्यमातून साखर उद्योगाची कोंडी होताना दिसत असून हा मुद्दा या हंगामात राजकीय पातळीवर गाजण्याची शक्यता आहे.

यावर्षीच्या ऊस गळीत हंगामाची तयारी साखर उद्योगाकडून सुरू झालेली आहे. यंदा हंगाम लवकर सुरू व्हावा असाही प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच साखर कारखानदारांची शेतकरी संघटनांकडून कोंडी केली जात आहे.

गेल्या दोन-तीन हंगामामध्ये साखर उद्योगाला साखर या मुख्य उत्पादनासह इथेनॉल, मळी, सहवीज निर्मिती आधी उपपदार्थातून  चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालेले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी शेतकरी संघटनांनी उचलून धरली आहे. त्यासाठी प्राथमिक पातळीवरील आंदोलनेही होत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा दौरा पूर्ण केला असून आता सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित केले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर्षी चा हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये द्यावेत अशी मागणी केलेली आहे. साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याच्या दृष्टीने या संघटनेने हालचाली सुरू केल्या आहेत.

शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुश या शेतकरी संघटनेने सोमवारपासून साखर कारखान्यावर दुचाकी यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे. या संघटने कडून ऊस दराचे विनियमन अधिनियम २०१३ या कायद्यातील तरतुदी नुसार साखर व उप पदार्थ विकून कारखान्याला मिळालेल्या एकूण उत्पन्नातील ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना अद्याप दिलेला नाही. गत वर्षी साखर, बगॅस आणि मळी विकून कारखान्यांना ६६०० रुपये एकूण उत्पन्न मिळाले. गत तीन हंगामात साखर व प्राथमिक उप पदार्थांना बाजारात उच्य दर मिळत आहेत. साखर कारखान्यांना मोठा नफा होऊन ते फायद्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रति टन ५०० रुपये हप्ता द्यावा आणि मगच कारखाने सुरू करावेत, अशी भूमिका संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी घेतली आहे.

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून स्वतंत्र चूल बांधलेल्या जय शिवराय शेतकरी संघटनेने कडूनही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदन देऊन या हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रति टन ५०० रुपये ऊस उत्पादन शेतकऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. ऊस उत्पादनाचा खर्च वाढत चालला असल्याने साखर कारखान्यांकडून कमी दर मिळाला आहे.

ऊस उत्पादन खर्चामध्ये  दुप्पट वाढ झाली असल्याने आणखी प्रति टन आणखी ५०० रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संघटनेचे नेते शिवाजी माने, सदाशिव कुलकर्णी, वैभव कांबळे, गब्बर पाटील आदींनी चालवली आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी अजूनही प्रत्येक क्विंटल ५०० रुपये तोटा होत आहे. जुनी कर्जे कायम आहेत. नवीन कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणी सांगितल्या आहेत. त्यामुळे नव्याने आणखी काही देणे शक्य नसल्याचा सुर साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ५०० रुपये उचलीच्या मुद्द्यावर यंदा साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकरी संघटनांकडून तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.