लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या टक्केवारीत (VTR) डेटा प्रकाशित करण्यात विलंब झाल्याबद्दल निवडणूक आयोगावर प्रचंड टीका झाली होती. त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर निवडणूक आयोगाने निकाल जलद आणि अधिक पारदर्शक पद्धतीने सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या अहवाल प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आता विलंब होणार नाही. कारण- निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्राच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना (PRO) दर दोन तासांनी नवीन ECINET या अॅपवर मतदारांची टक्केवारी थेट नोंदविण्याची परवानगी दिली आहे. या नवीन उपक्रमामुळे अंदाजे मतदान ट्रेंडच्या अपडेटमध्ये लागणारा वेळ कमी होईल. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सुधारित प्रक्रिया लागू केली जाईल. एक महत्त्वाचा बदल म्हणजे मतदान केंद्र सोडण्यापूर्वी मतदान केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मतदान संपल्यानंतर लगेचच अंतिम मतदानाचा डेटा ECINET मध्ये प्रविष्ट करतील. त्यामुळे अहवाल देण्यास होणारा विलंब लक्षणीयरीत्या कमी होईल आणि नेटवर्क उपलब्धतेनुसार मतदारसंघनिहाय मतदानाचा डेटा व्हीटीआर अॅपवर त्वरित उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
“भारतीय निवडणूक आयोग आता अंदाजे मतदान टक्केवारीच्या ट्रेंड्सबद्दल वेळेवर अपडेट देण्यासाठी एक सुव्यवस्थित, तंत्रज्ञानचालित प्रणाली सुरू करीत आहे. ही नवीन प्रक्रिया पूर्वीच्या मॅन्युअल रिपोर्टिंग पद्धतींशी संबंधित वेळेचं अंतर लक्षणीयरीत्या कमी करते”, असे निवडणूक आयोगाच्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हा उपक्रम निवडणूक आयोगाच्या वेळेवर सार्वजनिक संवाद साधण्याच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने सुरू केलेल्या सुधारणांपैकी हा एक उपक्रम आहे.
नियम काय आहेत?
निवडणूक आचारसंहिता नियम, १९६१ च्या नियम ४९Sच्या नियमबद्ध चौकटीअंतर्गत, जनसंपर्क अधिकाऱ्यांना उमेदवारांनी नामांकित केलेल्या आणि मतदानाच्या समाप्तीच्या वेळी मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधींना फॉर्म १७सी सादर करणे आवश्यक आहे. त्यामध्ये नोंदणी झालेल्या मतांचा हिशेब आहे.
या कायदेशीर आवश्यकतेत काहीही बदल झाला नसला तरी अंदाजे मतदान टक्केवारीच्या ट्रेंडची माहिती जनतेला देण्यासाठी सोईस्कर, बिगर-कायदेशीर यंत्रणा म्हणून विकसित झालेल्या व्हीटीआर (Voters Turnout Rate) अॅप अपडेट करण्याची प्रक्रिया अधिक सोपी केली जात आहे. त्यामुळे मतदारांच्या मतदानाचा रेट जलद गतीने अपडेट होण्यास मदत होईल.
नेमका बदल काय?
या नवीन उपक्रमांतर्गत अंदाजे मतदान ट्रेंडचे अपडेट कमी वेळात उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी नवीन ECINET (Electoral Commission of India Network) अॅपवर मतदानाची थेट नोंद करतील. प्रत्येक मतदारसंघातील या नोंदी स्वयंचलितपणे एकत्रित केल्या जातील. नवीन पद्धतीतही पूर्वीप्रमाणेच दर दोन तासांनी अंदाजे मतदान टक्केवारी ट्रेंड प्रकाशित होत राहतील.
ECINET अॅपचा वापर
तसेच मतदानाच्या शेवटी जनसंपर्क अधिकारी मतदान केंद्र सोडण्यापूर्वी ECINET अॅपवर मतदार मतदानाचा डेटा त्वरित प्रविष्ट करील. त्यामुळे ट्रेंडचे अपडेट मिळण्यात होणारा विलंब कमी होईल आणि नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या अधीन राहून मतदान संपल्यानंतर मतदारांच्या अंदाजे टक्केवारी अपडेट केलेल्या व्हीटीआर अॅपवर मतदारसंघानुसार ही सर्व माहिती उपलब्ध असेल याची खात्री असेल.
जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसेल तिथे ऑफलाइन नोंदी करता येतील आणि कनेक्टिव्हिटी पुनर्संचयित झाल्यानंतर त्या एकत्रित करता येतील. बिहार निवडणुकीपूर्वी हे अपडेटेड व्हीटीआर अॅप ECINET चा अविभाज्य भाग ठरेल.
आतापर्यंत संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून मतदार मतदानाचा डेटा मॅन्युअली गोळा केला जात असे आणि फोन कॉल, एसएमएस किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे रिटर्निंग ऑफिसर्सकडे पाठविला जात असे. ही माहिती दर दोन तासांनी एकत्रित केली जाते आणि व्होटर टर्नआउट (व्हीटीआर) अॅपवर अपलोड केली जाते. रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी आलेल्या प्रत्यक्ष नोंदींच्या आधारे मतदान टक्केवारीचे ट्रेंड अनेकदा तासन् तास उशिरा अपडेट केले जात होते. त्यामुळे चार-पाच तास किंवा त्याहून अधिक उशीर होत होता.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. कारण- काही प्रसंगी विलंबामुळे दुसऱ्या दिवशी मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. बिहार निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे आयोगाला मतदानाची आकडेवारी वेळेवर जाहीर करण्यास मदत होईल