नांदेड : अशोक चव्हाण यांना २०१९ मध्ये शह देण्यासाठी शिवसेना आमदार असलेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना नांदेडमधून भाजपकडून लोकसभेची उमेदवारी, त्यांनी ज्यांचा पराभव केला, ते अशोक चव्हाण पक्षात येताच त्यांना राज्यसभा सदस्यत्व, अमरनाथ राजूरकर यांना पुनर्वसनाची हमी अशी मुक्त उधळण करणाऱ्या भाजपाने नांदेडमध्ये सूर्यकांता पाटील आणि डॉ.माधवराव किन्हाळकर या अनुभवसिद्ध नेत्यांची पक्षात केलेली उपेक्षा आता अधिक ठळक झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाच्या स्थापनेनंतर या पक्षाला नांदेडमध्ये आपले खासदारकीचे खाते उघडण्यासाठी २४ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २००४ साली या पक्षातर्फे खासदार झालेले डी.बी.पाटील मुळचे काँग्रेसचेच होते. त्यानंतर १५ वर्षांनी खासदार झालेले चिखलीकर हे तर काँग्रेससह इतर पक्षांत संचार केलेले आणि आता खासदार होत असलेले अशोक चव्हाण हेही काँग्रेसचेच; पण त्यांच्यासोबत संघ-अभाविपच्या संस्कारातील अजित गोपछडे यांनाही संधी देत भाजपने नांदेडमध्ये ‘आपला खासदार’ पहिल्यांदाच केला आहे.

हेही वाचा : बबन घोलप यांचा फायदा कोणाला ?

जिल्ह्यात सध्या भाजपचे चार आमदार असले, तरी तेही मुळचे भाजपाचे नाहीत. पक्षाचे दिवंगत नेते चंद्रकांत मस्की यांच्यानंतर जनसंघ किंवा भाजपाच्या संस्कारातील आमदाराची जिल्ह्याला अजूनही प्रतीक्षा आहे. या पक्षाचे नांदेडमध्ये आता शत-प्रतिशत काँग्रेसीकरण होत असताना बर्याच जणांचे भले झाले; पण वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या सूर्यकांता पाटील आणि माजी राज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांना पक्षाने गेल्या दहा वर्षांपासून अडगळीतच ठेवले.

सूर्यकांताबाईंच्या गाठीशी तीन मोठ्या सभागृहांतील प्रतिनिधित्वाचा प्रदीर्घ अनुभव तर डॉक्टरांनी वयाच्या तिशी-चाळिशीदरम्यान विधानसभा गाजवलेली. दोघेही एकेकाळचे शरद पवारनिष्ठ; पण राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या अन्यायामुळे हे दोघे या पक्षातून बाहेर पडले. २०१४ साली त्यांनी देवेन्द्र फडणवीस यांच्याशी विचारविनिमय करून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने किन्हाळकरांना भोकरमध्ये विधानसभेची उमेदवारी दिली, पण अमिता अशोक चव्हाण यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. सूर्यकांताबाईंना तर अशी संधीही मिळाली नाही.

हेही वाचा : पुण्याचे कोडे कायम 

अलीकडे श्रीमती पाटील यांनी आयुष्यातील शेवटची संधी, असे म्हणत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा भाजपाकडे व्यक्त केली होती. पण हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील पुन्हा सक्रिय झाल्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता धुसर झाली आहे. डॉ.किन्हाळकर यांना २०१९ साली आधी लोकसभेसाठी आणि मग विधानसभेसाठीही नाकारून फडणवीसांनी त्यांना सक्तीची प्रतीक्षा करावयास लावली. आताही या दोघांना विस्तारलेल्या नांदेड भाजपात कोठेही वाव दिसत नाही.

हेही वाचा : निवडणूक रोखे योजनेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विरोधी पक्षांनी एकमताने केले स्वागत; पाहा, कोण काय म्हणाले?

एकत्रित काँग्रेसच्या कालखंडात वरील दोन्ही नेत्यांचे अशोक चव्हाण यांच्याशी सख्य नव्हतेच. दोघेही चव्हाणांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी, असेच राजकीय वर्तुळात मानले जात असे. १० वर्षांपूर्वी नांदेडमधील मोठा गट भाजपात गेला. चव्हाणांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर हे त्यांतील अग्रणी आणि आघाडीवीर होते. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांचा उचित मान राखला. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष करण्यात आले; पण पक्षात पुढे ‘देवेन्द्र पर्वा’त चिखलीकरांना अच्छे दिन आल्यामुळे हे आघाडीवीर २०१९-२० दरम्यान पिछाडीवर गेले. मग खतगावकर काँग्रेसमध्ये परतले. सूर्यकांताबाई आणि किन्हाळकर मात्र भाजपात राहिले. आता या पक्षात ‘अशोक पर्व’ आणि ‘अमर कहानी’चे नवे पर्व सुरू झाल्यानंतर तेथे आधीपासून असलेल्या वरील दोन नेत्यांची कैफियत ठळकपणे समोर आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nanded former minister suryakanta patil and dr madhavrao kinhalkar ignored in bjp print politics news css