या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान याठिकाणी राष्ट्रीय पक्षांची चुरस पाहायला मिळत आहे. मिझोरामच्या निवडणुकीची तशी फारशी चर्चा नाही. तेलंगणामध्ये तिरंगी लढत आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपासून तेलंगणाचा दौरा करत असून हजारो कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटने त्यांच्या हस्ते करण्यात येत आहेत. मंगळवारी (३ ऑक्टोबर) तेलंगणा येथे विकास प्रकल्पांचे उदघाटन करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ऊर्फ केसीआर यांच्याबाबतीत खळबळजनक खुलासा केला. केसीआर एनडीएत सहभागी होण्यासाठी इच्छूक होते. २०२० साली हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांना एनडीएत सामील व्हायचे होते, असा दावा मोदी यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “केसीआर यांनी एनडीएत येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर जी कृत्ये केली, ती पंसत न पडल्यामुळे मी त्यांना एनडीएत घेण्यास मी विरोध केला.” दरम्यान भारत राष्ट्र समितीने (BRS) पंतप्रधान मोदी यांचा दावा फेटाळून लावला आहे. बीआरएसचे नेते खलीकुर रहमान यांनी म्हटले की, पंतप्रधान ढळढळीत खोटे बोलत आहेत.

हे वाचा >> Telangana : मुख्यमंत्री केसीआर पंतप्रधानांचे स्वागत कधीच करत नाहीत; हिंदी बोलणाऱ्या मंत्र्याची केली नियुक्ती

तेलंगणा येथील जाहीर सभेत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजपाने हैदराबाद महानगरपालिकेत ४८ जागा जिंकल्यानंतर केसीआर यांना भाजपाचा पाठिंबा हवा होता. महानगरपालिकेची निवडणूक होण्याच्या आधी ते विमानतळावर माझे स्वागत करण्यासाठी येत असत, पण हैदराबाद मनपाच्या निवडणुकीनंतर त्यांनी अचानक स्वागतासाठी येणे बंद केले. हैदराबाद मनपाच्या निवडणुकीनंतर केसीआर दिल्लीत माझी भेट घेण्यासाठी आले होते, त्यांनी एनडीएत सामील होण्याची इच्छा बोलून दाखविली. तसेच मी त्यांना पाठिंबा द्यावा, अशीही विनंती त्यांनी केली होती. मी त्यांना (केसीआर) स्पष्टपणे सांगितले की, तुमच्या काही कृत्यांमुळे मी तुमच्यासह काम करण्यास इच्छूक नाही.”

२०२० साली बृह हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक पार पडली होती. यावेळी के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समितीला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ २१ जागा कमी पडत होत्या. भाजपाने १५० पैकी ४८ जागांवर विजय मिळविला होता. २०१५ पेक्षाही यावेळी भाजपाला चांगले यश मिळाले होते.

बीआरएस पक्षाचे प्रत्युत्तर

बीआरएसचे प्रवक्ते एम. क्रिशांक यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी राजकीय लाभ मिळवण्यासाठी खोटे बोलून खालची पातळी गाठत आहेत. “पुढच्या वेळी मुख्यमंत्री केसीआर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास जातील, तेव्हा त्यांनी एक कॅमेराही बाळगावा. कारण मोदी राजकीय लाभ मिळण्यासाठी अतिशय खालच्या पातळीवरही घसरू शकतात”, अशी प्रतिक्रिया किशांक यांनी दिली.

हे वाचा >> विश्लेषण : केसीआर यांची विस्ताराची गाडी जोरात, पण तेलंगणातच गतिरोधक?

केसीआर सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

तेलंगणामधील निझामाबाद येथे संपन्न झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. केसीआर यांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निझामाबाद मधील हळदी उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या मालाची विक्री होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल आणि राष्ट्रीय हळदी महामंडळाची (National Turmeric Board) स्थापना केली जाईल.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “बीआरएस सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मात्र आम्ही मागच्या काही वर्षांत ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार कोटींची रक्कम हस्तांतरीत केली आहे. “एक जिल्हा, एक उत्पादन” या योजनेअंतर्गत निझामाबाद जिल्ह्यात हळदीच्या उत्पादनाला चालना दिली. आम्ही हळदी उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार लवकरच हळदी महामंडळ स्थापन करू.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kcr wanted to join nda alliance says pm narendra modi in telangana rally kvg