Loksabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार की इंडिया आघाडी भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखू शकणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. देशातील विरोधी पक्ष ‘इंडिया आघाडी’ म्हणून एकवटले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या आघाडीचे नेतृत्व करत आहेत. देशातील विरोधकांचा आवाज बुलंद करण्यासाठी ते सध्या प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. त्यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’मध्ये द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना अनेक विषयांवर आपली रोखठोक मते मांडली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत एकाही महिलेला उमेदवारी का नाही?

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र येत दिल्लीमधील लोकसभेच्या जागा लढवत आहेत. मात्र, तिथे एकाही महिला उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि वायव्य दिल्ली अशा तीन जागा आम्हाला मिळाल्या. वायव्य दिल्ली हा राखीव मतदारसंघ आहे. आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्यात आम्ही संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही पक्षांनी दर्जेदार उमेदवार उभे केले आहेत. पंजाबमध्ये मात्र आम्ही वेगवेगळे लढत आहोत, त्यामुळे तिथे जागावाटपाचा काही प्रश्नच येत नाही.”

हेही वाचा : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?

काँग्रेस देशात कमी जागांवर का लढते आहे?

काँग्रेस कदाचित पहिल्यांदाच ३०० हून कमी जागांवर लोकसभेची निवडणूक लढवत आहे. सहकारी पक्षांनी तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे काँग्रेसने या जागांचा त्याग केला आहे का, या प्रश्नावर खरगे म्हणाले की, “आम्ही ३५० हून अधिक जागांवर लढत आहोत आणि आतापर्यंत २८० उमेदवार घोषित केले आहेत. काहीवेळेला आपल्याला त्याग करत थोडे जुळवून घ्यावे लागते; जसे आम्ही अलीकडेच महाराष्ट्रामध्ये केले. आघाडी टिकवून ठेवणे, एकजुटीने लढणे आणि मोदी सरकारचा पराभव करणे हाच यामागचा उद्देश आहे.”

काही राज्यांकडे काँग्रेसचे दुर्लक्ष का?

भाजपा चारशेपार जाण्याची भाषा करतो आहे. अधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपाने पश्चिम बंगाल आणि दक्षिणेतील राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने फक्त दक्षिणेत आपले लक्ष केंद्रित केले असून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे का, या प्रश्नावर खरगे म्हणाले की, “आघाडीतील आमचे मित्रपक्ष मजबूत आहेत. जिथे आमच्या नेत्यांची गरज आहे, तिथे आम्ही त्यांचा वापर करतो. तर जिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे मोठे नेते आहेत, तिथे त्यांनीच प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे. मात्र, अनेक राज्यांमधील प्रचार बाकी आहे आणि आम्ही निवडणुकीच्या टप्प्यांनुसार नियोजन केले आहे.”

रायबरेलीतून अद्याप उमेदवार का नाही?

रायबरेली मतदारसंघाबाबत इतके गूढ का निर्माण केले आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, “आपल्या विरोधकांना कोड्यात टाकण्याचे काम आम्ही करतो. अर्थातच, ती जागा आम्ही रिकामी ठेवणार नाही. तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, असा उमेदवार तिथे उभा केला जाईल.”

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची चर्चा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर तसेच काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर विरोधक संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत बोलताना खरगे म्हणाले की, “याबद्दल मला माहीत नाही. कदाचित काहींना ही कल्पना सुचली असेल. सर्दी झाली म्हणून आपण आपले नाक कापत नाही. तसेच एखाद्या समस्येवर आपल्याला उपाय शोधायला लागतो, मग तुमच्याबरोबर लोक उभे राहतात, आम्ही तो शोधत आहोत. त्यामुळे जेव्हा लोक उभे राहतील तेव्हा भाजपाला सत्तेतून पायउतार व्हावे लागेल.”

राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामधील अनुपस्थिती भाजपाच्या पथ्यावर?

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामधील काँग्रेसच्या अनुपस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत आहेत. गुजरातमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनीही पक्षाच्या या निर्णयावर टीका केली आहे. पक्षाने यात सहभाग नोंदवायला हवा होता, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न खरगे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. ज्याला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जायचे आहे, तो आज, उद्या वा केव्हाही जाऊ शकतो. पंतप्रधान हे पुजारी नाहीत, त्यामुळे मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये त्यांनी पुढाकार का घ्यावा? मंदिराचे बांधकाम अर्धवट झालेले असताना फक्त राजकीय हेतूसाठी त्यांनी हा सोहळा घडवून आणला आहे.”

पुढे त्यांनी अनेक सवाल करत म्हटले की, त्यांनी मला आणि सोनिया गांधींना निमंत्रण दिले होते. मात्र, पक्षाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी निमंत्रण दिले होते का? हा सोहळा राजकीय होता की धार्मिक होता? राजकारण आणि धर्म एकत्र करण्याची काय गरज आहे? असा सवालही त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, “आजही माझ्या जातीतील लोकांना मंदिरात जाऊ दिले जात नाही, हे वास्तव आहे. राम मंदिराचा मुद्दा बाजूला ठेवा. आजही छोट्या गावातल्या मंदिरात जाण्यासाठीही दलितांना झगडावे लागते. दलितांना पाणी पिऊ दिले जात नाही, त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये शिकू दिले जात नाही. एखाद्या दलित नवरदेवाने मिशी वाढवली वा तो घोड्यावर बसून मिरवणूक काढू लागला तर त्याला खाली खेचून मारले जाते. अशा परिस्थितीत मी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जावे? माझी उपस्थिती त्यांना चालली असती का?”

पुढे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही उल्लेख करत भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रपती पदावर असलेल्या द्रौपदी मुर्मूंनाही या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींबरोबर उभे राहू दिले नाही. त्या देशाच्या प्रमुख असूनही संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला त्यांना निमंत्रण दिलेले नव्हते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही नव्या संसदेची पायाभरणी करू दिली नव्हती. दलितांच्या कोणत्या प्रतिनिधित्वाबाबत ते बोलत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन

इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार?

इंडिया आघाडीचा विजय झाल्यास राहुल गांधींना माघार घ्यायला लावून एखाद्या इतर व्यक्तीला नेतृत्व दिले जाईल का, असा प्रश्न खरगे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “१९८९ नंतर गांधी परिवारातील कोणता सदस्य हा पंतप्रधान, उपपंतप्रधान, मुख्यमंत्री वा केंद्रीय मंत्रीपदावर दिसला का? फक्त गांधी कुटुंबाला शिव्या घालण्याचे काम मोदीजी करतात. भाजपाला असे वाटते की, गांधी कुटुंब संपुष्टात आले की काँग्रेसही संपेल आणि भाजपाला आरएसएससोबत देशात मोकळे रान मिळेल. इंडिया आघाडीला सत्ता मिळाली तर कुणी एकटा हा निर्णय घेणार नाही. आम्ही आघाडीतील सर्व पक्ष एकत्र बसून मिळालेल्या जागांवरून योग्य तो निर्णय घेऊ.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge interview congress loksabha elections 2024 pm narendra modi bjp vsh