Mamata Banerjee Remark on INDIA Bloc and Congress : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीबाबत चिंता व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्या म्हणाल्या की “मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. मी इंडिया आघाडी बनवली होती. जे लोक या आघाडीचं नेतृत्व करत आहेत त्यांनी ही आघाडी सांभाळली पाहिजे, अधिक सक्षम केली पाहिजे. परंतु, त्यांना ती आघाडी सांभाळता येत नसेल तर त्यात मी काय करू शकते. मी फक्त एवढंच सांगेन की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकजुटीने पुढे जायला हवं”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ममता बॅनर्जी यांनी नुकतीच न्यूज १८ बांगला या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांना विचारण्यात आलं की भाजपा व त्यांची एनडीए देशात इतकी शक्तीशाली होत चालली आहे अशा स्थितीत इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न होताना का दिसत नाहीत? तुम्ही इंडिया आघाडीची कमान आपल्या हाती का घेत नाही? यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मला संधी मिळाली तर मी जरूर ‘इंडिया’ची धुरा आपल्या हाती घेईन. मला संधी मिळाल्यास मी उत्तमपणे इंडिया आघाडी सांभाळू शकते. मला बंगालच्या बाहेर जायचं नाही. मी बंगालची मुख्यमंत्री आहे आणि माझं राज्य हीच माझी प्राथमिकता असल्याने माझी बंगालबाहेर जाण्याची इच्छाच नाही. परंतु, मी इधे बंगालमध्ये, कोलकात्यात बसून इंडिया आघाडी सांभाळू शकते, पुढे नेऊ शकते”.

हे ही वाचा >> Mahayuti Government : महायुतीत कोणत्या सहा खात्यांसाठी नाराजीनाट्य रंगण्याची चिन्ह; खातेवाटप जाहीर होण्यास उशीर का लागतोय?

विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव, मित्रपक्षही दुरावले

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. मात्र, त्यांना बहुमतासह सत्ता काबीज करता आली नाही. त्यानंतरच्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने इंडिया आघाडीची ताकद कमी झाली आहे. तर, आम आदमी पार्टी व तृणमूल काँग्रेस या आघाडीमधील दोन मोठ्या पक्षांनी काँग्रेसपासून आंतर राखलं आहे. तृणमूलने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही.

हे ही वाचा >> Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार निवडणूक निकालांसह शरद पवारांच्या छायेतून कसे बाहेर पडले?

ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर मित्रपक्षांची भूमिका काय?

दरम्यान, इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर, इतर सहकारी पक्षांनी सावधगिरी बाळगत टिप्पणी केली आहे. काहींनी म्हटलं आहे की इंडिया आघाडीच्या बैठकीत असा प्रस्ताव चर्चेसाठी आलेला नाही. अशा मुद्द्यांवर आम्ही प्रतिक्रिया देण्यपूर्वी अंतर्गत चर्चा होणं आवश्यक आहे. आमच्यात अद्याप तरी अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. अशी एखादी चर्चा झाल्यास आम्ही त्यावर भाष्य करू, असं इंडिया आघाडीतील एका खासदाराने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं.

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीसांना घवघवीत यश मिळालं खरं, पण आता कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार?

काँग्रेसवर डाव्यांची नाराजी, ‘इंडिया’बरोबर जागावाटवारून वाद

कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस डी. राजा यांनी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत करताना इंडिया आघाडीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की “डाव्या पक्षांना भारतातील जागावाटपात हवं तसं सामावून घेतलं गेलं नाही. आम्हाला पुरेशा जागा दिल्या नाहीत”. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता राजा यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, काँग्रेसबद्दल ते म्हणाले की “पक्षातील दिल्लीतील नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. जागावाटपासंदर्भात काँग्रेस व डाव्यांमध्ये काही अडचणी आहेत”.

हे ही वाचा >> अलोट गर्दी नि जल्लोष! ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ … देवाभाऊ’ घोषणांनी परिसर दुमदुमला

सपा व काँग्रेसमधील अंतर वाढलं

इंडिया आघाडीत सध्या आलबेल चित्र दिसत नाही. उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीने काँग्रेसला बरोबर घेतलं नाही. तर, काँग्रेसने संसदेत उद्योगपती अदाणींविरोधात निदर्शने केली तेव्हा त्यामध्ये सपाचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले नव्हते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjee says i built india bloc can run it tweezed congress asc