Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गटाबरोबर युती करण्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीत मोठं भाष्य केलं. मराठी माणसांच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाद किरकोळ आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं सांगितलं.

त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. यावरून राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आपापल्या भूमिका देखील मांडल्या आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राची नजर लागलेली आहे. दरम्यान, राज ठाकरे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा ते रमेश किणी प्रकरणामुळे ते काहीसे बॅकफूटवर आले होते. तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती. हे रमेश किणी प्रकरण नेमकं काय आहे? या विषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा शिवसेनेचे नेतृत्व करायचे तेव्हा त्यांचे वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली. त्यानंतर राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. पण जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते, तेव्हा राज ठाकरे एका प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले होते, ते म्हणजे रमेश किणी हत्या प्रकरण. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते आणि त्यामुळे राज ठाकरे यांची शिवसेनेतील राजकीय पकड कमकुवत झाली होती, असं मानलं जातं.

रमेश किणी प्रकरण नेमकं काय आहे?

२३ जुलै १९९६ रोजी मुंबईतील दादर परिसरातील रहिवासी असलेले रमेश किणी हे पुण्यातील एका चित्रपटगृहामध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. तेव्हा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात शिवसैनिकांना त्यांचा फ्लॅट ताब्यात घ्यायचा होता असा आरोप होता. या प्रकरणात मृत रमेश किणी यांच्या पत्नीने राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रमेश किणी यांच्या पत्नीने म्हटलं होतं की, त्यांचं कुटुंब ज्या भाड्याच्या घरात राहत होते ते घर खाली करण्यासाठी घरमालक राज ठाकरे यांच्यामार्फत त्मनसेचे त्यांचा मानसिक छळ करत होते.

या प्रकरणात पोलिसांनी राज ठाकरे यांच्या एका निकटवर्तीय व्यक्तीला अटक केली होती. विरोधकांनीही हा मुद्दा लावून त्यावेळेस लावून धरला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पुढे सीबीआयने राज ठाकरे यांची चौकशी करून त्यांना क्लिनचिट दिली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका झाली होती आणि त्यामुळे ते काहीसे बॅकफूटवर गेले होते. आणि त्याच काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर आपली पकड मजबूत केल्याचं बोललं जातं. पुढे काही काळाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचं कार्याध्यक्ष करत त्यांच्याकडे सेनेचे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर काही काळातच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाल्यानंतर म्हणजे २००६ नंतर राज ठाकरेंचा करीश्मा चांगलाच वाढला होता. २००९ मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यामुळे राज्यात मनसेची मोठी चर्चा सुरु होती. पण त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. गेल्या २० वर्षांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा अनेकदा झाल्या, पण दोन्ही बंधू एकत्र आले नाहीत. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांना दोन्ही ठाकरे बंधूंनी सकारात्मक भूमिका मांडली असली तरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का, हे येत्या काळातच पाहायला मिळेल.