पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सध्या अनेक अडचणींना तोंड देत आहे. मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत परिस्थितीबाबत तृणमूल काँग्रेसवर गैरव्यवस्थापनाचे आरोप करण्यात आले. कोलकाता उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीनं तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला दोषी ठरवलं आहे. तृणमूलचे एक आमदार आणि एक नगरसेवक यांची नावं त्यामध्ये आहेत. तसेच पोलीस पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी एक मुद्दा विरोधकांच्या हाती लागला आहे.

विधानसभा निवडणुकीला आता काही महिनेच शिल्लक आहेत. मुर्शिदाबादमधील गंभीर परिस्थिती आणि कोलकाता उच्च न्यायालयाचा चौकशी अहवाल समोर आला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसवर हल्ला करण्याची आणि अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचं राजकारण करणारा पक्ष म्हणून चित्रित करण्याची संधी आता भाजपाला मिळाली आहे. याआधी टीएमसीच्या नेत्यांवर काही गंभीर आरोप नव्हते. मात्र, अहवाल समोर आल्यानंतर हे आरोप खोडून काढणं टीएमसीला काहीसं अवघड होत आहे.

तृणमूलच्या नेत्यांवर गंभीर आरोप

गेल्या काही महिन्यांत पक्षाला हा तिसरा धक्का आहे. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयानं ३ एप्रिल रोजी २५ हजार ७५३ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा आणि सरकारला नवीन निवड प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. १६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं सरकारला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या २५ टक्के महागाई भत्त्याची रक्कम सहा आठवड्यांच्या आत देण्याचे निर्देश दिले. आता मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या चौकशी अहवालात त्या वेळचे हल्ले स्थानिक नगरसेवक मेहबूब आलम यांनी निर्देशित केले होते. तसेच स्थानिक पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आणि अनुपस्थित असल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय समितीने सादर केलेल्या माहितीनुसार, मोठा हल्ला दुपारी अडीचनंतर झाला. तेव्हा मेहबूब आलम गुंडांसोबत आले आणि त्यामध्ये मुखवटे घातलेले समसेरगंज, हिजलतला, शिउलीतला व दिग्रीचे रहिवासीदेखील होते.

समसेरगंजचे आमदार अमीरुल इस्लाम हिंसाचाराच्या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणत्या घरांवर हल्ला झाला नाही ते पाहिलं आणि त्यानंतर हल्लेखोरांनी ती घरं पेटवून टाकली. बेतबोनाच्या ग्रामस्थांनी त्यावेळी पश्चिम बंगाल पोलिसांना फोन केला; मात्र पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी आमदार त्या परिसरात होते. त्यांनी तोडफोड पाहिली आणि ते निघून गेले, असे गंभीर आरोप या अहवालात करण्यात आले आहेत.

अहवालातील आरोप बिनबुडाचे?

धुलियान नगरपालिकेचे माजी अध्यक्ष यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “मी न्यायालयाचा आदर करतो; पण माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मी हिंदू समुदायातील लोकांसोबत कदमतला येथे होतो. काही गुन्हेगारांना जेव्हा शस्त्रे घेऊन जाताना पाहिले तेव्हा मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी हल्ला करण्यासाठी आमचा पाठलाग केला, तेव्हा आम्ही नदाबपारा येथे गेलो आणि माझ्यासह काही हिंदू कुटुंबांनी तिथे आश्रय घेतला. त्यानंतर आम्ही समसेरगंज पोलिसांना फोन केला; मात्र त्यांनी फोन घेतला नाही. पण माझा वॉर्ड सावरण्यासाठी मीच प्रयत्न केलेत. मग जो माझा वॉर्ड आहे, त्याला मी आग लावू शकतो का? हे भाजपा-आरएसएसचं षडयंत्र आहे”, असे स्पष्टीकरण आलम यांनी दिले आहे.

आमदार अमीरुल इस्लाम यांनीही त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत. “मी तिथे हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करीत होतो. ते माझे कर्तव्य आहे. नंतर मी त्या भागात दौरा केला आणि लोकांना मदतही केली. हे एक षडयंत्र आहे”, असे इस्लाम यांनी म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्यानं सांगितलं, “अमीरुल आणि आलम दोघेही तृणमूलच्या सत्तेत पुढे आले आहेत. आमदार इस्लाम यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे; मात्र आता ते व्यवसाय करतात. तसेच आलम हे स्थानिक विडी उद्योगाशी संबंधित काम करतात.”

भाजपाचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले, “हिंसाचारात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आणि त्यात तृणमूल काँग्रेसचे नेते सामील होते, असं अहवालात म्हटलं आहे. हिंसाचार थांबविण्याऐवजी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या कृतीकडे दुर्लक्ष करण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन असल्याचं दिसून आलं.”

“मुर्शिदाबादमध्ये जे घडलं, ते निंदनीय आहे .कोणीही त्याचं समर्थन करीत नाही. हिंसाचारानंतर राज्य प्रशासनानं आपली कर्तव्यं पार पाडली आहेत; मग ते पीडितांचं पुनर्वसन असो वा या प्रकरणात अटक करणं असो”, असं तृणूमल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटलं आहे. “या घटनेसंदर्भात आणखी एक पैलू म्हणजे यात मोठ्या कटाचा समावेश आहे. बाहेरील लोक त्यामध्ये रदाचित सीमेपलीकडून आलेले लोक राज्यात कसे घुसले? तृणमूल काँग्रेस एक जबाबदार विरोधी पक्ष आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत देश एकजूट करीत असताना भाजपा नेते मुर्शिदाबाद प्रकरणाचं राजकारण करण्यात व्यग्र आहेत. हा त्यांच्या कटाचा भाग आहे”, असंही पुढे घोष यांनी म्हटलं आहे.