‘कल्याण पुर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराचे मी समर्थन करत नाही. मात्र हा गोळीबार त्यांना का आणि कोणत्या परिस्थितीत करावा लागला याचाही तपास व्हायला हवा’ या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे कल्याण लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भाजप-मनसेच्या जवळीकीची चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा शीतयुद्ध सुरु झाले आहे. आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थन करणारे फलकही या भागात भाजप पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी कल्याण, डोंबिवलीच्या दौऱ्यावर आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करत आमदार गायकवाड यांच्याविषयी घेतलेल्या भूमीकेची चर्चा या भागात सुरु झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : चावडी: खुंटा बळकट करण्याचाच भाग..

राज ठाकरे कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर होते. मनसे पदाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. या दौऱ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यातील शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड गोळीबारासंबंधी विचारले असता राज यांनी घेतलेली भूमीका सध्या चर्चेत आली आहे. ‘ एक आमदार भर पोलीस ठाण्यात थेट गोळीबार करतो. त्यांची ही मानसिकता तयार होण्यामागचे कारण काय? या मानसिकतेपर्यंत त्यांना कोणी आणले याचीही सखोल चौकशी पोलिसांनी करणे आवश्यक आहे’, अशी भूमीका मांडल्याने मुख्यमंत्री पुत्र खासदार डाॅ.शिंदे यांचे समर्थक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या गोळीबार प्रकरणानंतरही या विधानसभा मतदारसंघात आमदार गायकवाड यांच्याविषयी सहानभूती असणाऱ्या त्यांची समर्थकांची संख्या मोठी आहे. खासदार शिंदे गेल्या चार वर्षापासून आमदार गायकवाड यांची मिळेल त्या मार्गाने कोंडी करत होते असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. महेश गायकवाड यांना पुढे करुन आमदार गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांना खिंडीत गाठण्याचे अनेक प्रसंग यापुर्वी घडले होते. यामुळे आमदार गायकवाड कमालिचे अस्वस्थ होते. ही अस्वस्थता टोकाला पोहचली आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे भाजपच्या या भागातील पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यानंतर समाजमाध्यमांवर सुरु झालेल्या संदेश युद्धात आमदार गायकवाड यांचा उल्लेख ‘आगरी वाघ’ असा करत आगरी समाजाच्या एकीकरणाचे आवाहनही ठराविक वर्गाकडून केले जात होते. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गणपत गायकवाड समर्थक असलेल्यांच्या भूमीकेच्या जवळ जाणारे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा झटका, मंदिराच्या उत्पन्नावर कर लावण्याचे विधेयक फेटाळले, दुसऱ्यांदा मांडण्याच्या तयारीत

राजू पाटीलही अस्वस्थ ?

दिवा रेल्वे स्थानकातील सोयी सुविधांच्या लोकार्पण आणि भूमीपुजन सोहळ्याच्या निमीत्ताने सोमवारी खासदार शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील एकमेकांच्या शेजारी बसलेले पहायला मिळाले. यापुर्वी आमदार पाटील यांच्या घरातील साखरपुड्यानिमीत्त शिंदे पिता-पुत्रानी जातीने उपस्थित रहात या दोन नेत्यांमधील राजकीय दुरावा कमी कसा होईल यादृष्टीने प्रयत्न केले होते. असे असले तरी मागील चार वर्षांचा अनुभव पहाता खासदार शिंदे यांची कार्यपद्धती आमदार पाटील यांना मान्य नसल्याचे दिसते. डोंबिवलीतील भाजप नेते रविंद्र चव्हाण आणि राजू पाटील यांची चांगली गट्टी आहे. खासदार शिंदे यांच्या कार्यपद्धतीविषयी या दोघांच्या मनात नाराजी असल्याचे त्यांचे समर्थक दबक्या आवाजात सांगतात. त्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गणपत गायकवाड प्रकरणात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप-मनसेच्या जवळकीची चर्चा या मतदारसंघात पुन्हा एकदा सुरु झाली आहे. यासंबंधी आमदार राजू पाटील यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही तो होऊ शकला नाही. भाजप नेत्यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray s support in ulhasnagar firing case at mp shrikant shinde s kalyan lok sabha constituency print politics news css
First published on: 27-02-2024 at 09:01 IST