एकीकडे अनेक राज्यांमधील प्रतिस्पर्धी पक्षांचे माजी मुख्यमंत्री, आमदार, खासदार आदी बडे नेते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होत असताना, पश्चिम बंगालमध्ये मात्र नेतेमंडळी भाजपा सोडून अन्य पक्षांमध्ये जाताना दिसत आहेत. गेल्या एकाच आठवड्यात भाजपाच्या एका आमदारानं व एका खासदारानं पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर अल्पसंख्याक खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी अधिकृतरीत्या भाजपाला ‘राम राम’ ठोकला नसला तरी अलिपूरदूरच्या लोकसभेच्या जागेवरून उघड नाराजी व्यक्त केली आहे. संदेशखाली प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या तृणमूल काँग्रेससाठी भाजपाच्या नेत्यांचं पक्षांतरण एक दिलासा देणारी बाब ठरत आहे. विशेष म्हणजे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प. बंगालला भेट देत अनेक प्रकल्पांचं उद्घाटन केलं व संदेशखालीतील पीडितांची भेट घेतली, त्याच मुहूर्तावर भाजपामधील नेत्यांनी विरोधी पक्षाला जवळ केल्याच्या घटना घडल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपामधून आत्तापर्यंत बाहेर पडलेला शेवटचा नेता म्हणजे झारग्रामचे खासदार कुणार हेमब्राम. यापुढे आपण समाजकार्याला वाहून घेणार आहोत, असे सांगत हेमब्रामनी शनिवारी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. अर्थात, सूत्रांची माहिती आहे की, लोकसभेच्या जागेसाठी पुन्हा विचार होणार नसल्याचे कळल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. २०१९च्या निवडणुकांमध्ये तृणमूलच्या बिरभा सरेन यांचा १० हजार मतांनी पराभव करत हेमब्राम पहिल्यांदाच खासदार झाले. पण, निवडणुकांच्या प्रचारात दिलेली आश्वासने पाळा अशी आठवण करून देताना, तीन वर्षांपूर्वी हेमब्रामना महिलांनी घेराव घेतला होता. आमच्या घरांमध्ये वचन दिलेलं पाणी अजूनही आलेलं नाही याची आठवण महिलांनी त्यांना करून दिली होती.

२०१२ पासून तृणमूलचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या झारग्राममध्ये हेमब्रामच्या विजयानं भाजपाचा शिरकाव झाला खरा. मात्र २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सातही जागा तृणमूलनं जिंकल्या आहेत. डाव्यांच्या कालखंडात हिंसाचारानं त्रस्त झालेली जनता ममता बॅनर्जींच्या विविध लोकोपयोगी योजनांमुळे त्यांच्यामागे असल्याचे दिसून आले आहे.

“ही तर भाजपाच्या शेवटाची सुरूवात”

मातुआ समुदायाला आपलेसे करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना शुक्रवारी धक्का बसला. राणाघाट दक्षिण या मतदारसंघाचे आमदार मुकूट मणी अधिकारी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत भाजपाला चांगलेच अडचणीत टाकल्याचे दिसत आहे. २०१९च्या निवडणुकांपासून मातुआ समाज ‘सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट’च्या अंमलबजावणीसाठी भाजपाच्या मागे राहिला. हा समुदाय तृणमूलसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जवळपास तीन कोटी एवढी यांची संख्या असून प. बंगालमध्येच सुमारे दीड कोटी मतदार मातुआ समाजाचे आहेत. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेली ही जागा लढवताना २०२१ मध्ये अधिकारींनी बरनाली देब रॉय यांचा १८ हजार मतांनी पराभव करताना तब्बल ५० टक्के मते मिळवली होती. राणाघाट दक्षिणमध्ये २०१६ साली सीपीएमचा तर २०११ मध्ये तृणमूलचा उमेदवार विजयी झाला होता. भारतीय जनता पार्टीला नेते सोडत असून ही भाजपाच्या शेवटाची सुरूवात आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूलचे प्रवक्ते अरूप चक्रवर्ती यांनी दिली आहे.

…तरीही लाल किल्ल्यावरून मोदीच भाषण करणार – भाजपाला विश्वास

जॉन बार्ला यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी म्हणजे प. बंगाल भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मदारीहाटचे आमदार मनोज टिग्गा यांचा विचार करताना बार्ला यांना डावलल्यामुळे त्यांची घुसमट झाली आहे. उत्तर बंगालमध्ये खासदार नसलेल्या तृणमूलसाठी भाजपामधील सत्तासंघर्ष संधीच्या रुपात समोर आला आहे. २०१९ मध्ये उत्तर बंगालमधल्या आठ पैकी सात जागी भाजपानं बाजी मारली होती. अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या अलिपूरदूर येथून लढताना २०१९ मध्ये बार्ला यांनी तृणमूलच्या दसरथ तिर्की यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं पराभव केला होता.

हेही वाचा : संदेशखालीमुळे ममता बॅनर्जी एकट्याच पडल्या आहेत का? इंडिया आघाडीतील इतर पक्षनेत्यांच्या अनुपस्थितीत आज प्रचाराचं रणशिंग…

हे सगळे घडत असले तरी भाजपानं मात्र या सगळ्याचा निवडणूक निकालांवर परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. भाजपाचे राज्य प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी सांगितले की, “ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदीच जनतेशी संवाद साधतील यात काही शंका नाही. जनता आमच्यासोबत आहे आणि आम्हीच बहुमतानं निवडून येणार.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West bengal bjp mla and mp join tmc and other parties rac