भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करोना कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फिरुन काम करणाऱ्यांमध्ये स्वत:चा आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असल्याचा उल्लेख केलाय. पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी कोरोनाच्या संपूर्ण संकटकाळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यातील इतर कोणत्याच नेत्याने केलं नाही, असं म्हटलं आहे. आम्ही करोनाच्या कालावधीमध्ये सतत फिरत आहोत. आमच्या दोघांइतकं कोणताही नेता फिरला नसेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करोनाच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांना दिलेला इशारा हा प्रेमळ सल्ला असल्याचंही पाटील म्हणालेत. “नितीनजी आम्हा सर्वांचे पालक आहेत. आई जशी मुलाला म्हणते ना संभाळून जा, गाडीतून हात बाहेर काढू नकोस, अशा भूमिकेमधून ते सांगतात. ते टीका करत नाहीय. ते फक्त काम करताना संभाळून करा असं सांगत आहेत,” असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही करोनासंदर्भातील सगळं काम संभाळून करतोय असंही पाटील म्हणाले. कार्यक्रमांची संख्या आम्ही फार मर्यादीत ठेवलीय असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

भाजपा नेत्यांची मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांना रसद पुरवली जात असून नागपूर कनेक्शनसंदर्भात काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, “सचिन सावंत यांनी आरोप करू नयेत पुरावे द्यावेत,” असं पाटील म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना नैराश्य, मानसिक संतुलन बिघडलं आहे अशी टीका केल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, “चव्हाण यांना खरं बोलण्याचा राग आला,” असं पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी समिती…

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावे यासाठी समाजातर्फे होणाऱ्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून पक्षाचे नेते व कार्यकर्ते त्यात  सहभागी होतील, अशी घोषणा रविवारी पाटील यांनी केली. मराठा आरक्षणासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपच्या समितीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, आमदार आशीष शेलार, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे.