पुणे : जिल्ह्यातील काही नागरिक हिमाचल प्रदेश राज्यात पर्यटनासाठी गेले आहेत. यामध्ये गेल्या दोन दिवसांत १७ जणांचा संपर्क होत नसल्याने या व्यक्तींच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या १७ पैकी मंगळवारी दहा व्यक्तींचा संपर्क झाला असून ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली. उर्वरित सात पर्यटकांचा संपर्क होत नसल्याने त्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला देण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तरेकडील राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु असून पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या राज्यांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी जातात. ४ ते ९ जुलैपर्यंत चंदीगढ ते हिमालच प्रदेशातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या १७ व्यक्तींचा संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. सोमवार आणि मंगळवारपर्यंत यातील दहा व्यक्तींचा संपर्क झाला असून ते सुरक्षित स्थळी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाला मंगळवारी दिली. उर्वरित सात व्यक्तींशी संपर्क होत नसल्याने याबाबतची माहिती राज्य शासनाला देण्यात आली असून राज्य शासन हिमाचल प्रदेशातील स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. संबंधित व्यक्तींपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 citizens of pune were trapped in floods in himachal pradesh pune print news psg 17 amy