कर्नाटकात काँग्रेसला अभूतुपूर्व यश मिळाले. हाच कर्नाटक पॅटर्न आता संपूर्ण देशभर लागू करणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. देशात कोणताही कर्नाटक पॅटर्न लागू दिला जाणार नाही, असा निर्धारच त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुण्यातील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सगळे म्हणताहेत की कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार. त्यांचा कर्नाटक फॉर्म्युला लोकसभेतच लक्षात येईल. लोकसभेत आपण २८ पैकी किमान २५ जागा निवडून येऊ. पण तरीही, जे लोक म्हणतात कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही असा विचार कराल की अल्पसंख्यांकांचं ध्रुवीकरण करून तुम्हाला निवडून येता येईल, पण हे शक्य नाही. कारण या ठिकाणी शिवरायांनी एकेक मावळा तयार केला आहे. त्याला देव, देश, धर्माकरता कसं लढायचं हे माहितेय, त्यामुळे निश्चितपणे भाजपाचा मावळा दाखवून देईल. तुम्ही कितीही तुष्टीकरण करा, लांगूलचालन करा. लांगूलचालन करून कोणताच कर्नाटक पॅटर्न चालणार नाही. येथे एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न, बीजेपी पॅटर्न, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न चालेल. दुसरा पॅटर्न येथे चालू शकणार नाही”, असा एल्गार देवेंद्र फडणवीसांनी केला.

हेही वाचा >> “..तर २६/११ चा हल्ला नाना पटोलेंनीच केला”, देवेंद्र फडणवीसांचं ‘त्या’ आरोपांवर प्रत्युत्तर

“आता हे तिघे एकत्रित येताहेत म्हणतात. आज भाजपा आणि शिवसेनेची युती अतिशय भक्कम आहे. ज्या शिवेसनेने विचाराकरता सरकार सोडलं, एकनाथ शिंदे सरकारमध्ये होते. विचारांकरता सरकार सोडलं ते आपल्यासोबत आहेत. ज्यांनी सरकारकरता विचार सोडले ती शिल्लकसेना महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीत भाजपा कोणत्याही परिस्थितीत पालिका, जिल्हापरिषद, लोकसभा, विधानसभेत निवडून येईल. आपल्या निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदींची कार्यशैली, सामान्यांचा विकासाचा नरेटिव्ह आहे, असंही ते म्हणाले.

पुन्हा निवडून येऊ

“उद्धवजी म्हणतात जा गावोगावी आणि सांगा आपलाच विजय झाला. आपल्या बापाचं काय जातंय. बडवा जाऊन, काही हरकत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनात सामील व्हा. पण तुमच्या मनात कोणतीही शंका ठेवू नका, पोपट मेलाय. हे सरकार पूर्णपणे संवैधानिक, घटनात्मक आहे. तुमच्या सर्वांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण करेल. आणि पुन्हा एकदा निवडून येईल हा विश्वास मी व्यक्त करतो,” असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे उद्धवजी, जे बनायचे ते स्वत:च्या भरवशावर बनायला हवे. दुसर्‍यांच्या बळावर ते बनता येत नाही. कुणाचे कितीही बळ घेतले तर वाघ तर बनता येते, पण, तो वाघ सर्कशीतील असतो. स्वत:च्या बळावर वाघ झालात, तरच तो जंगलाचा राजा असतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्रात एक पक्ष भाकरी फिरविणारा दुसरा भाकरीचे तुकडे तोडणारा तर तिसरा संपूर्ण भाकरीच हिसकावून घेणारा. पण, आपला पक्ष गरिबांच्या भाकरीची चिंता करणारा, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis slams to oppositions over karnataka pattern in pune sgk