पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, गाजर, घेवडा या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली होती. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडीतील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशातून हिरवी मिरची २५ ते ३० टेम्पो, इंदूर येथून ७ ते ८ टेम्पो गाजर, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, तामिळनाडूतून २२५ प्लास्टिक जाळी (क्रेट्स) तोतापुरी कैरी, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो घेवडा, गुजरात, कर्नाटकातून मिळून ६ ते ७ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून ५०० ते ५५० गोणी सातारी आले, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, मटार ६०० ते ७०० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक अशी आवक झाली, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ५० ते ५५ टेम्पो अशी आवक झाली.
पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांना मागणी
पितृपंधरवड्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. कोथिंबीर, कांदापात, चाकवत, करडई, पुदिना, पालक या पालेभाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख २५ हजार जुडी, तसेच मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली होती. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) – कोथिंबीर – १००० ते १५००, मेथी – १००० ते १२००, शेपू – ८०० ते १०००, कांदापात – १५०० ते २०००, चाकवत – ५०० ते १००, करडई- ४०० ते ८००, पुदीना – ५०० ते १०००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा – ४०० ते ७००, चुका- ५०० ते ८००, चवळई – ३०० ते ६००, पालक – १५०० ते २०००
कलिंगड, खरबूज, सीताफळाच्या दरात घट
आवक वाढल्याने खरबूज आणि कलिंगडाच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी घट झाली होती. सीताफळाच्या प्लास्टिक जाळीच्या दरात २० रुपयांनी घट झाली होती. सफरचंदची आवक कमी झाल्याने पेटीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली होती. मागणी वाढल्याने डाळिंबाच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. अन्य फळांचे दर स्थिर होते. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी मोसंबी ५० ते ६० टन, संत्री १८ ते २० टन, डाळिंब १०० ते १३० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे १००० ते १५०० गोणी, कलिंगड २ ते ४ टेम्पो , खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू १५ हजार खोकी, पेरू ८०० ते ९०० प्लास्टिक जाळी, अननस ६ ट्रक, बोरे ३० ते ४० पोती, सफरचंद ७ ते १० हजार पेटी, सीताफळ १५ ते २० टन अशी आवक झाली.