पुणे : दररोज हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची पहिली चाचणी जुलैमध्ये यशस्वीपणे पार पडली होती. गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आज पुणेरी मेट्रो प्रथमच हिंजवडीतून बाहेर पडली.
हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोची माण डेपोपासून ते बालेवाडी स्टेडियम येथील स्टेशन क्रमांक १० पर्यंत दुसरी चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. या मेट्रो मार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. सुरुवातीला जमीन भूसंपादनातील अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे काम पुढे ढकलले गेले होते. तब्बल २३.३ किमी लांबीच्या या मार्गामुळे दररोज वाढत जाणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. माण डेपो ते पीएमआर-४ स्टेशन दरम्यान पहिली चाचणी जुलै महिन्यात यशस्वीरीत्या पार पडली आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असणार असून शहरातून हिंजवडीला कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या एक लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
चार गाड्या दाखल
हा मार्ग भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी भागीदारीत ( पीपीपी) उभारला जाणारा मेट्रो प्रकल्प आहे. टाटा व सिमेन्स या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमातून पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या नावाने प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू झाले होते. आतापर्यंत प्रकल्पासाठी चार मेट्रो रेलगाड्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक गाडीत सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करू शकणार असून ८० किमी प्रतितास या वेगाने गाड्या धावणार आहेत.
शेवटच्या टप्प्यातील सुविधा महत्त्वाच्या
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम वेगाने पूर्ण होणे वाहतुकीच्या समस्यांवर उपाय ठरणार आहे. मात्र केवळ मेट्रो मार्ग सुरू करणे पुरेसे ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत सहज पोहोचण्यासाठी ई-रिक्शा, फीडर बस आणि रिक्षा अशा शेवटच्या टप्प्यातील (लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी) सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा, प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी आणि खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात फारसा फरक पडणार नाही. यासाठी प्रभावी नियोजन करून सुरक्षित व सोयीस्कर सुविधा देणे आवश्यक आहे.