पुणे : कात्रज भागातील आंबेगाव परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांनी उघडकीस आणला. महिलेचा रिक्षाचालकाशी वाद झाला. वाद सुरू असताना वीज चमकली आणि रिक्षा क्रमांक दिसला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी तपास करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली.

शाहरूख शकील मन्सूर (वय २७, सध्या रा. हडपसर, मूळ रा. अमखेरा, बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ३२० ठिकाणचे चित्रीकरण ताब्यात घेतले हाेते. कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपीचा माग काढण्यात आला, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. सहायक आयुक्त राहुल आवारे या वेळी उपस्थित होते.

गेल्या महिन्यात २० मे रोजी आंबेगाव परिसरात नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला होता. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलिसंनी खून झालेल्या महिलेची ओळख पटविली. महिलेचे नाव प्रीती वाखारे (वय ३५) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. प्रीती दुचाकीवरुन सिंहगड रस्त्यावरील काेल्हेवाडीतून नवले पूल परिसरात आल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी या भागातील १०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले होते. २० मे रोजी शहरात जोरात पाऊस झाला होता. त्यामुळे काही ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण धूसर आले होते. एके ठिकाणचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले. तेव्हा विज चमकल्याचे दिसून आले होते. विजेचा प्रकाशात एक रिक्षा दिसून आली होती. रिक्षात बसून प्रीती गेल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी संबंधित रिक्षाचा क्रमांकावरुन तपास सुरू केला.

पोलिसांनी जवळपास दहा हजार रिक्षा क्रमांकाची चौकशी केली. त्यांच्या मालकांचे नाव पत्ते शोधले होते. त्यानंतर रिक्षाचालक मन्सूर याची माहिती मिळाली. मन्सूर हा उत्तर प्रदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात पाेहोचले. मन्सूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आर्थिक वादातून त्याने वाखारेचा खून केल्याची कबुली दिली. तपास पथकातील उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी ही कामगिरी केली.