पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या प्रवाशांना वेळेवर सुविधा मिळावी म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आगार प्रमुखांनी अचूक नियोजन करावे. तसेच, वेळोवेळी बसची दुरुस्ती सुनियोजित करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश ‘पीएमपी’च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले. प्रवाशांच्या तक्रारींचा ओघ कायम असल्याने मुंडे यांनी आगार प्रमुखांना सूचना केल्या.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांपर्यंत धावणाऱ्या पीएमपीचे एक जूनपासून प्रवासी भाडे वाढले आहे. मात्र, सेवेत कुठलाही फरक पडला नसून, प्रवाशांना स्थानक तसेच थांब्यांवर प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. मार्गावर बस बंद पडण्याचे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील सेवा कोलमडून पडल्याने नियमित प्रवाशांना याचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे प्रवासी आणि प्रवासी संघातील सदस्यांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

सद्यःस्थितीला शहरातील मध्यवर्ती पेठांमधील रस्त्यांपासून उपनगरापर्यंत दिवसभरात ३८१ मार्गांवरून एक हजार ६०० बस सुरू आहेत. दिवसभरातून दहा लाख प्रवासी ‘पीएमपी’ने प्रवास करत असताना भाडे वाढविल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सामान्य नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत असूनही उदार होऊन पीएमपीचा अवलंब करावा लागत आहे. मात्र, सेवेमध्ये त्रुटी असल्याने सामान्य प्रवाशांना फटका बसत असल्याने नक्कीच याचा परिणाम प्रवासी संख्येवर होईल, असे मत पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी नोंदवले.

असे असताना पीएमपीचे अधिकारी प्रवासी संख्या १४ ते १५ लाखांपर्यंत नेहण्याचे उद्दिष्ट ठेवत आहेत. अनियमित सेवा, वारंवार येणाऱ्या यांत्रिक आणि तांत्रिक बिघाडामुळे पीएमपीवरील विश्वासार्हता गमाविल्याचेही शितोळे यांनी स्पष्ट केले.

अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द

पीएमपीच्या वेळापत्रकानुसार मार्गांवरील फेऱ्यांचे नियोजन सुरू असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात काही फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. याचा फटका दररोज पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जात असले, तरी जुन्या बस वेळोवेळी दुरुस्त कराव्या किंवा वाहतूक मर्यादा ओलांडलेल्या बस सेवेतून काढून टाकाव्या, अशी मागणीही यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली.

भोसरी फाट्यावरून दैनंदिन प्रवास करत असताना भाडेवाढ केल्याने पाच किमीपेक्षा थोडे जास्त अंतर ओलांडले, तरी २० रुपये आकारण्यात आले. मात्र, अचानक बस बंद पडल्याने नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. ज्या प्रमाणे पैसे घेतले जात आहे, तशी सुलभ सेवा द्यावी.- प्रशांत गिते, प्रवासी