पुणे : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे गडकरींना प्रकल्पाची पाहणी न करताच माघारी जावे लागले. गडकरी येणार असल्याने वाहतूक पोलिसांनी शनिवार वाड्याच्या मागून मनपाकडे जाणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज पूलावरून शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक तात्पूरती थांबविण्यात आली होती.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता गडकरी शनिवारवाडयाजवळ येऊन प्रकल्पाची पाहणी करणार होते. मात्र, गडकरी यांने विमानतळावर विलंबाने आगमन झाल्याने त्यांच्या पुढील दौऱ्यांनाही विलंब झाला. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांची गर्दी झाली असून पावसाची जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे अगोदरच परिसरात वाहतूक कोंडी असताना पाऊस आणि गर्दीमुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. गडकरी ११ वाजून २५ मिनिटांनी कार्यक्रमस्थळी आल्याने महापालिकेकडून शनिवारवाड्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आणि छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबवून ठेवली.
गडकरी यांनी कार्यक्रमस्थळी येताच भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केले. त्यानंतर प्रकल्प पाहणीसाठी वाहनात बसून स्वारगेटच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. यावेळी आमदार हेमंत रासने देखील त्यांच्या वाहनात बसून मार्ग दाखविण्यासाठी निघाले. मात्र, सकाळची वेळ असल्याने दोन्ही वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यातच वाहनचालकांनी जोरजोरात ‘हाॅर्न’ वाजविण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी पुढील मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याचे गडकरींना सांगितले. अखेर गडकरी यांनी चालकाला माघारी गाडी वळविण्यास सांगितले, अन् रासने खाली उतरले.
दरम्यान, आमदार रासने यांनी वाहतूक कोंडीमुळे गडकरी यांनी पाहणी दौरा रद्द केला असून नंतर पाहणी करण्यासाठी येईल, असे गडकरी यांनी आश्वासन दिले असल्याचे सांगितले.