पुणे : इतिहास अभ्यासासमवेत गेल्या सहा दशकांपासून जपलेल्या कवितांचे ‘आषाढस्य प्रथम दिने’ सादरीकरण होणार आहे. डाॅ. राजा दीक्षित यांच्या ‘कुरबॅश आणि इतर कविता’ या कवितासंग्रहाचे गुरुवारी प्रकाशन होत आहे.

साहित्यदीप प्रतिष्ठान आणि संवेदना प्रकाशन यांनी हा योग जुळवून आणला आहे. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित कार्यक्रमात राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

‘वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे इयत्ता चौथीमध्ये असताना पहिली कविता केली होती. ‘तूच केलीस कशावरून?’ असे मित्रांनी विचारले तेव्हा त्यांच्या समाधानासाठी आणखी दोन कविता लिहून दाखविल्या. या हिशेबाने गेली ६० वर्षे मी कवितालेखन करतो आहे’, असे दीक्षित यांनी सांगितले.