पुणे: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली.या घटनेनंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.त्याच दरम्यान पुण्यातील मराठा समाजातील विविध राजकीय संघटनांच्या प्रतिनिधीची आगामी काळात लग्न सोहळा कशा प्रकारे केले जावे,किती खर्च करावा, याबाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीला अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे,शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे,माजी महापौर दत्तात्रय धनकवडे,माजी महापौर कमल व्यवहारे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आयोजक अरविंद शिंदे म्हणाले,सासरच्या मंडळींकडून सातत्याने दिलेल्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही अंत्यत दुर्देवाची गोष्ट आहे.या घटनेनंतर अनेक गोष्टी विचार करायला लावणार्‍या आहेत.यामुळे आज पुणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या मंडळींची बैठक झाली.त्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा झाली आहे.त्यामध्ये प्रामुख्याने हगवणे बेटी आणि रोटीचा बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला आहे.तसेच पुढील काळात मराठा समाजातील कोणत्याही भगिनींला सासरच्या मंडळींकडून त्रास दिल्यास त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, समाजामध्ये लग्न ठरवित असताना अगोदर त्या कुटुंबियांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे.त्या कुटूंबाची आसपासच्या लोकांमध्ये संबध कसे आहेत.आपण केवळ जमीन किती आणि पैसे किती आहेत.हे पाहून आपल्या मुलींची लग्न करू नये,जो तरुण आणि त्याचे कुटुंबिय आयुष्यभर मुलींचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतील,अशाच कुटुंबात मुलीचे लग्न करावे,त्याच बरोबर ठरलेल्या वेळेवर लग्न लागले पाहिजे.जावईचा मानपान भेट वस्तू यासह नव्याने आलेल्या प्रथा थांबल्या पाहिजे.तसेच मोठ मोठे महाल,लग्नापूर्वी फोटो शूट, जावईला महागड्या वस्तु देणे यासह अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.त्यामुळे एक लग्न जवळपास कोटी रुपयांच्या पुढे जाते.यामुळे मुलीच्या घरच्या मंडळीची ऐपत नसली,तरी जागा विकून लग्न अनेक ठिकाणी पार पडले जातात.या सर्व प्रथा थांबल्या पाहिजे.त्यामुळे यापुढील काळात अगदी कमी लोकांमध्ये आणि साध्या पद्धतीने लग्न करण्याचा ठराव आजच्या बैठकीत करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.