ठाणे : मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वे प्रवाशांच्या समस्या पुन्हा एकदा चर्चेला येऊ लागल्या आहेत. लोकल गाड्यांमधून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागत असतो. त्याचप्रमाणे प्रवाशांना स्थानकातही विविध त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, भिक्षेकरींचा वावर, फलाटावरील काही भागात छत नसणे, तांत्रिक बिघाडामुळे सरकते जिने बंद होणे, फरशा निखळलेल्या अवस्थेत असणे, फलाटावरील पाणपोई अस्वच्छ आणि गळती लागलेली असणे, छतांवर कचरा असणे अशा विविध समस्यांना प्रवासी दररोज सामोरे जात असल्याचे चित्र आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानक हे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. कल्याण, डोंबिवली तसेच कर्जत, कसारा येथून नागरिक कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानकात येत असतात. तसेच ठाण्याहूनही लाखो नोकरदार मुंबई तसेच ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबई दिशेने प्रवास करतात. तसेच ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, घोडबंदर, ढोकाळी अशा विविध भागात खासगी कार्यालये आहेत. येथे काम करणारे प्रवासी दररोज स्थानक परिसरातून ये-जा करतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मुंब्रा रेल्वे अपघातानंतर प्रवाशांच्या सोयीसुविधा अभाव पुन्हा एकदा समोर येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, भिक्षेकरींचा वावर असणे, त्यांच्याकडून परिसरात अस्वच्छता पसरवणे, फलाटावरील काही ठिकाणी छत नसणे, सरकते जिने तांत्रिक कारणांमुळे बंद होणे, फरसा निखळलेल्या असणे, पाणपोई अस्वच्छ असणे, फलाटावर भंगाराचे सामान असणे अशा अनेक समस्या प्रवाशांना दररोज सहन सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
नेमक्या समस्या कोणत्या ?
पाणपोई अस्वच्छ फलाटावर प्रवाशांसाठी पाणपोईची सुविधा करण्यात आलेली आहे. मात्र, पाणपोईजवळ अस्वच्छता असल्याचे चित्र आहे. तसेच तिला गळती लागल्याचे दिसून येते.
भिक्षेकरी, गर्दुल्यांचा वावर
ठाणे स्थानक परिसरात भिक्षेकरी, गर्दुल्यांचा वावर असल्याचे निर्दशनास येते. भिक्षेकरी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांच्याकडे भिक्षेची मागणी करतात. अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी बसून हे भिक्षेकरी भिक्षा मागतात. किंवा प्रवाशांच्या मागे जात, हात लावत भिक्षा देण्यासाठी सांगतात. तसेच, स्थानक परिसरात गर्दुल्ले वाटेच झोपत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडून आसपासचा परिसर देखिल अस्वच्छ केला जातो. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
फलाटावर छत नसणे
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, पाट, सात, नऊवरील अने भागात छत नसल्याचे चित्र आहे. संपुर्ण फलाटावर छत असल्याचे दिसते मात्र फलाटावरील काही भाग अजूनही छताविनाच असल्याचे उघडकीस येत आहे.
तांत्रिक कारणामुळे सरकते जिने बंद होणे
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवर सरकते जिने आहेत. त्यातील अनेक सरकते जिने हे तांत्रिक बिघाडामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी बंद होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
प्रतिक्रिया
रेल्वेच्या अनेक समस्यांपैकी ज्या पायाभूत समस्या आहेत त्या उद्भवल्या आहेत. यामध्ये स्थानकात पाणी नसणे, अस्वच्छता असणे, जिन्यावरून छतांवर टाकण्यात आलेला कचरा त्याच स्थितीत असणे या पायाभूत समस्या आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाने सुविधांकडे लक्ष द्यावे. नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना