बदलापूर : सोमवारी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. एकीकडे शाळेत जाण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे बदलापुरात एकमेव उड्डाणपुलावर सलग पाचव्या दिवशी कोंडी झाली. त्याचवेळी कोसळणाऱ्या पावसाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना भिजवले. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उशिराने शाळेत पोहोचले. तर शहरात प्रमुख रस्त्यांवर कोंडीचे चित्र होते. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालक संताप व्यक्त करत होते.

गेल्या काही दिवसांपासून रंगून पडणाऱ्या पावसाने सोमवारी जोरदार हजेरी लावली. यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारी झाली. त्यामुळे सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होती. बदलापूर शहरात पूर्व पश्चिम प्रवासासाठी एकमेव उड्डाणपूल हा पर्याय आहे. बेलवली भागातील दुहेरी मार्ग जोड रस्त्याच्या कामासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथून होणारी लहान वाहनांची वाहतूक पूर्णपणे एकमेव उड्डाणपुलावरून होते आहे. परिणामी या उड्डाणपुलावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोंडी होत आहे.

सोमवारी सकाळपासूनच या उड्डाणपुलावर कोंडी होत होती. गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली शालेय बस वाहतुकीची आजपासून रस्त्यावर भर पडली. या बहुतांश बस भुयारी मार्गाने प्रवास करत होत्या. मात्र सोमवारी या सर्व वाहनांचा भार उड्डाणपुलावर आला. परिणामी सकाळपासूनच उड्डाणपूल कोंडीत अडकला होता. बदलापूर पश्चिमेतील स्थानकापासून पूर्वेत जाणारी वाहने, बेलवली, मांजर्ली भागातून येणारी वाहने उड्डाणपुलाशेजारील चौकात येऊन थांबत होती. त्यामुळे वाहनचालक चिंचोळ्या रेल्वेखालील रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र हा मार्गावरही कोंडी झाली. परिणामी वाहनचालकांना अडकून पडावे लागेल. त्याचवेळी उड्डाणपुलाच्या शेजारीच शहरातील सर्वात मोठी आदर्श शाळा आणि महाविद्यालय आहे. या शाळेच्या सुटण्याचा, भरण्याचा वेळ आणि कोंडीचा वेळ एकच झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालक आणि शाळेच्या बस कोंडीत अडकल्या.

त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी, पालक, छत्री, रेनकोट असूनही भिजले. अनेक विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्या दिवसाच्या स्वागताच्या उत्साहावर पाणी फिरले.

मेट्रोची चर्चा, कोंडीकडे दुर्लक्ष

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात मेट्रो येणार अशी चर्चा रंगली आहे. सर्वच सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी याचे श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषदा आणि माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या कोंडीकडे कुणाचे लक्ष जाताना दिसत नाही. त्यामुळे भविष्यातील मेट्रोची स्वप्ने सोडून आजच्या वर्तमानातील कोंडीवर लक्ष द्या अशा संतप्त भावना बदलापूरकार व्यक्त करताना दिसत आहेत.