शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा समूह विकास योजनेतून पुर्नविकास करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापौर संजय मोरे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे समूह विकास योजना तातडीने राबविण्याची मागणी केली.

ठाण्यात किमान ११०० धोकादायक इमारती असून यात किमान सव्वा लाख लोक जीव मुठीत राहतात. त्यांना दिलासा मिळावा आणि हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी समूह विकास योजनेच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला आहे. मात्र, त्यात काही त्रुटी राहिल्यामुळे घोषणेच्या पलीकडे ही योजना गेली नाही. असे असतानाच ठाणे महापालिकेने या योजनेसाठी आवश्यक असलेला पायाभूत सुविधांवर होणाऱ्या परिणामांसंबधीचा इंपॅक्ट असेसमेंट अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनाने त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांनी ठाण्यातील धोकादायक इमारतींचा समूह विकास योजनेच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याचा प्रश्न रखडला असून त्यावर निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demanding for cluster development in thane for risky building