ठाणे : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणून काम केल्यानंतर युवाशक्ती पुन्हा बेरोजगार झाली असून महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने येत्या १२ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने दिला आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील – चाकुरकर यांनी गुरुवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजनेपाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना राबवली.

तसेच, १० लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतीमाह ६ हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असून लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ शिंदे यांनी एक प्रकारे आपल्या भाचा – भाचींना फसवल्याचा आरोप चाकुरकर यांनी केला.

काळी दिवाळी साजरी करणार

या बेरोजगार प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी. रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा. आदी मागण्यांसाठी रविवार, १२ ऑक्टोंबर रोजी ३६ जिल्हयातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार “चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया” आंदोलन छेडून एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील – चाकुरकर यांनी दिला आहे.

संघटनेच्या मागण्या एक लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरूपी रोजगार मिळालाच पाहिजे. प्रशिक्षणार्थ्यांना मानधनात दुप्पट वाढ झालीच पाहिजे. ज्या दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला त्या दिवशीपासून वयोमर्यादा मोजदाद झाली पाहिजे. राज्यातील सुशिक्षित आणि आताचे प्रशिक्षित युवक आणि युवतींना रोजगार हमीच्या धरतीवरती कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे, अशा मागण्या चाकुरकर यांनी केल्या आहेत.