ठाणे : भिवंडी येथील लोनाड भागात पावसाचे पाणी साचल्याने मंगळवारपासून गोदामामध्ये अडकलेल्या नऊ कामगारांची सुखरुप सुटका करण्यास आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाला यश आले.
कल्याण येथील उल्हास नदीमध्ये पाणी वाढल्याने लोनाड येथील धूळखाडीतील पाणी वाढले. त्यामुळे येथील सोनाळे बापगाव हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्यामुळे रस्त्या नजीक असलेल्या एका गोदामात काम करणारे नऊ कामगार मंगळवारपासून तेथे अडकून होते. बुधवारी सकाळी पाणी वाढल्याने या कामगारांनी गोदाम मालकाला याबाबतची माहिती दिली.
तर स्थानिक ग्रामपंचायत सरपंच वनिता जाधव व ग्रामविस्तार अधिकारी व्यंकटेश धोंडगे यांना ही माहिती मिळताच त्यांनी तहसीलदार अभिजित खोले यांना याबाबत कळविले. त्यानंतर मंडळ अधिकारी संतोष आगिवले यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी चित्रा विशे हे भिवंडी अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन पथकासह घटनास्थळी दाखल झाले. होडीच्या मदतीने कामगारांची सुखरूप सुटका केली आहे.