लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर मुंबई बाजूकडील फलाटाच्या उर्वरित भागावर निवारा नसल्याने पाऊस सुरू असताना प्रवाशांची त्रेधातिरपिट उडत आहे. मागील काही महिन्यांपासून प्रवासी, रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फटालावर निवार टाकण्याची मागणी करत आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासी निवार असलेल्या भागात उभे राहत होते. लोकल आल्यानंतर धावत जाऊन लोकल पकडत होते. तीन डबे उभे राहत असलेल्या भागावर निवार नसल्याने पाऊस सुरू झाल्यापासून प्रवाशांची कुचंबणा होते. निवार नसलेल्या भागात पाऊस सुरू असताना एकही प्रवासी उभा राहत नाही. हे प्रवासी निवारा असलेल्या भागात किंवा जिन्याच्या पायऱ्यांवर उभे राहतात. त्यामुळे एकाच भागात प्रवाशांची गर्दी होते. या गर्दीतून वाट काढत फलाटावर कल्याण बाजूकडे जाणे अनेक वेळा प्रवाशांना शक्य होत नाही.

आणखी वाचा-ठाण्यात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

फलाट क्रमांक पाचवरुन जलद लोकल मुंबईच्या दिशेने धावतात. लोकल ठाकुर्ली स्थानकातून सुटली की मग डोंबिवली स्थानकातील प्रवासी धावपळ करत, पाऊस सुरू असेल तर छत्री, पिशवी सांभाळत लोकल पकडण्यासाठी धावतात. यामध्ये महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होते. लोकलमध्ये चढताना पाऊस सुरू असल्याने छत्री बंद केली की प्रवासी भिजतात. गर्दीमध्ये भिजलेल्या कपड्यांवर प्रवाशांना प्रवास करावा लागतो.

प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील मुंबई बाजूकडील भागात फलाटावर निवारा बांधावा अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers are inconvenienced due to lack of shelter on the platform in dombivli railway station mrj