ठाणे : मी ठाण्याचा भाई आहे, दिवाळी कशी असते, मी दाखवतो असे म्हणत एकाने भरवस्तीमध्ये गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आदित्य जाधव, ऋषीकेश जाधव, बुलेट यादव आणि कमलाकर ढगे अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. १२ जूनच्या मध्यरात्री आदित्य जाधव हा त्याच्या काही मित्रांसोबत सावरकरनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १२० जवळील मैदानात मद्य पित होता. त्यावेळी त्याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली. या घटनेनंतर त्याने कमरेवर खोचलेली पिस्तुल बाहेर काढली.

मी ठाण्याचा भाई आहे, मी येथे राज्य करतो अशी धमकी त्याने दिली. दिवाळी कशी असते असे म्हणत त्याने एकाच्या दिशेने गोळीबार केला. ही गोळी चुकविल्याने ती कोणाला लागली नाही. त्यानंतर तो त्याच्या साथिदारांसोबत तेथून निघून गेला. या घटनेनंतर एका तरुणाने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत २५,३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत १३५, ३७ (१), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३ (५), ३५१ (२), ३५२, ६१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आदित्यसह इतर चौघांना अटक झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.