लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या श्रीनगर भागातून मुंबई शहरात जाण्यासाठी अरुंद रस्ता अस्तित्वात असून या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता हा रस्ता २० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी बाधित जमिनीचे आरक्षण बदलावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेने फेरबदलाचा प्रस्ताव तयार करून नागरिकांकडून हरकती व सुचना मागविल्या आहेत.

ठाणे आणि मुंबई शहराच्या वेशीवर श्रीनगर परिसर येतो. हा परिसर ठाणे महापालिका क्षेत्राच्या हद्दीत आहे. या भागातून मुंबईत जाण्यासाठी रस्ता आहे. हा रस्ता जेमतेम ९ ते १० मीटरचा आहे. श्रीनगर, किसननगर, शांतीनगर, कैलाशनगर आणि रामनगर तसेच आसपासच्या परिसरातील अनेक नागरिक मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. वाहन संख्येच्या तुलनेत हा रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी कोंडीची समस्या निर्माण होते. या कोंडीचा फटका नागरिकांना बसतो. नेमकी हि बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आता हा रस्ता २० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा-ढोकाळी-कोलशेत रस्ता निधी अभावी रखडपटटी, अरुंद रस्त्यावर होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण

श्रीनगर येथून मुंबई भागात जाणारा रस्ता टाटा फायजन कंपनीच्या भागातून जातो. ही कंपनी सद्यस्थितीत बंद आहे. या कंपनीची जमिन औद्योगिक क्षेत्रात येते. कंपनी बंद असल्याने त्यातील ८६५३ चौ.मी इतकी जमिन औद्योगिक क्षेत्रातून वगळून त्यावर खेळाचे आरक्षण टाकण्यात आले होते. आता हि जागा रस्ते कामात बाधित होणार असून त्यासाठी ४२३ चौ.मी इतक्या जमीनीचे आरक्षण बदलावे लागणार आहे. शिवाय, रहिवास, औद्योगिक क्षेत्राची जागा बाधित होणार असल्याने त्याचेही आरक्षण बदलावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेने फेरबदलाचा प्रस्ताव तयार करून नागरिकांकडून हरकती व सुचना मागविल्या आहेत. यानंतर त्यावर सुनावणी घेऊन पालिका हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srinagar residents of thane will travel to mumbai hassle free mrj