ठाणे : नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेकडे ५० दशलक्षलीटर इतक्या वाढीव पाण्याची मागणी दोन महिन्यांपुर्वी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला नसल्यामुळे ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून ११५ दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्याने ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो. घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असून येथे मोठमोठी गृहसंकुले उभी राहीली आहेत. या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. या संदर्भात नागरिक आणि राजकीय नेते सातत्याने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने वाढत्या लोकसंख्येचा विचार करून भविष्यात लागणाऱ्या वाढीव पाणी आरक्षित करण्यासाठी राज्य शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकडे घोडबंदर भागासाठी ५० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्याची मागणीही केली आहे. यासंबंधीचे पत्र ठाणे महापालिकेने मुंबई महापालिकेला दोन महिन्यांपुर्वी दिले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला नसल्यामुळे ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा कायम असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय

ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला. त्यामध्ये शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी ४५ टक्के वाढ होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान, पायाभुत सुविधा, क्लस्टर योजना, याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल, असा पालिकेचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसेच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पुढील ३० वर्षांचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार शहराला पुढील ३० वर्षात प्रतिदिन १११६ दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे. सद्यस्थितीत शहराला दररोज ६१६ दशलक्षलीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर असून उर्वरित ४०० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी सुर्या, भातसा या धरणांसह स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळावे यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केल आहेत. याशिवाय, एमएमआरडीएच्या प्रस्तावित काळू धरणांमध्ये ४०० दशलक्षलीटर इतका पाणी कोटा मंजुर करावा यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

हेही वाचा…बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर

ठाणे महापालिका क्षेत्राला ५० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्यात यावे अशी मागणी मुंबई महापालिकेकडे करण्यात आलेली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. विनोद पवार उपनगर अभियंता (पाणी पुरवठा विभाग), ठाणे महापालिका

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two months ago thane municipal corporation requested bmc for 50 million liters of water sud 02