उल्हासनगरः नागरी आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे उल्हास नदीत तयार होणारी जलपर्णी पर्यावरणप्रेमींच्या रेट्यामुळे नदीपात्रातून हटवण्यास सुरूवात झाली आहे. मात्र नदी पात्रातून काढलेली ही जलपर्णी नदीच्या किनारीच ठेवली जात आहे. त्यामुळे पुन्हा ही जलपर्णी नदीत जाण्याची भीती व्यक्त होते आहे. तसे झाल्यास नदीत पुन्हा जलपर्णी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे जलपर्णी हटवण्याच्या मोहिमेलाच धक्का पोहोचण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

उल्हास नदीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळते आहे. नदीच्या उगमानंतर काही किलोमीटरपासून नदीपात्रात सांडपाणी मिसळते आहे. यात काही औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्याचाही समावेश असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत. याच सांडपाण्यामुळे उल्हास नदीत गेल्या काही वर्षात जलपर्णीही वाढली आहे. या जलपर्णीमुळे पाणी पुरवठा यंत्रणेवर परिणाम होतो आहे. त्याचसोबत पाण्याची पातळीही सातत्याने घटते.

या जलपर्णीला हटवून उल्हास नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी वर्षानुवर्षे पर्यावरणप्रेमी आंदोलने करत असून प्रशासनाला निवेदनही देत आहेत. त्याचीच दखल घेत दीड महिन्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत राज्याचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता यांनी तातडीने जलपर्णी हटवण्यासाठी पाऊले उचलण्याचे आदेश दिले होते. तर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याची जबाबदारी घेत जलपर्णी हटवण्यासाठी यंत्रे उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला होता. जलपर्णी काढल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आणि त्यातून गृहोपयोगी वस्तू तयार करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्याचीही तयारी सुरू केली होती.

त्यानुसार गेल्या महिन्यात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली जलपर्णी हटवणारी यंत्रे उल्हास नदीत उतरवण्यात आली. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास सुरूवात झाली. गेल्या दोन आठवड्यात टप्याटप्याने ही जलपर्णी काढण्यात आली आहे. मात्र ही जलपर्णी काढल्यानंतर नदीच्या किनाऱ्यावरच टाकली जाते आहे. या यंत्रातून जमा केलेली जलपर्णी नदीच्या किनारी टाकून यंत्रे पुन्हा नदी पात्रात परततात. गेल्या काही दिवसात काढलेली ही जलपर्णी या नदीकिनारी पडून आहे. यातील काही जलपर्णी येथेच सुकते आहे. मात्र ही जलपर्णी पुन्हा तग धरू लागल्यास नदी पात्रात पुन्हा जलपर्णी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. त्यामुळे ही जलपर्णी बाजूला काढून तीची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

जलपर्णीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची ?

प्रदुषण नियंत्रण मंडळाने यंत्रे उपलब्ध करून जलपर्णी काढण्याचे काम केले असले तरी जलपर्णीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मंडळाची नाही, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्या त्या ठिकाणी जलपर्णीची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे असेही मंडळाने सांगितले आहे. त्यामुळे जलपर्णीची जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो आहे.