लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. महापालिकेकडून पाणी साचू नये असे आवाहन नागरिकांना केले जाते. पंरतु शासकीय प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणीच पाणी साचून रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच खड्ड्यात पडून एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

मुंबई उपनगर आणि ठाणे शहरातील रस्ते मार्गिकेवर होणारी वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर भागात सेवा रस्ते, मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मेट्रोचे खांब उभारणीसाठी खड्डे खणले आहेत. या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे बसविण्यात येत नाही. त्यामुळे अनेकदा प्रवासी किंवा पादचारी या खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचू लागले आहे. खड्ड्यांची खोली आणि रुंदी मोठी असल्याने पाण्याचे प्रमाणही अधिक आहे.

आणखी वाचा-भिवंडीत सहा वर्षीय मुलाची क्षुल्लक कारणावरून हत्या

ठाणे महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना घरामध्ये पाणी साठवून ठेऊ नका असे आवाहन केले जाते. परंतु एमएमआरडीएकडूनच, खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा केला जात नाही. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे देखील बसविण्यात आले नाही. त्यामुळे एखादा वाहन चालक पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडू मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील पाणी तात्काळ उपसावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

पावसाने उसंत घेतल्यानंतर खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी पंपद्वारे बाहेर काढण्यात येते. ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहे त्याठिकाणी साचलेल्या पाण्याचा वेळोवेळी निचरा केला जातो असे एमएमआरडीए प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water stagnant in pits dug for metro works risk of epidemics mrj