छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या विविध भागांत रविवारीही पुन्हा मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पंचाईत झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील सिडको ते क्रांती चौकापर्यंतच्या ठरावीक भागात तासभर जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना भिजतच प्रवास करावा लागला. तर अनेकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी मार्गातील झाड, पेट्रोलपंप, बंद दुकाने, हाॅटेलांचा आधार घेतला. शहरातील अदालतरोड, सिडकोतीलच आझादचौक आदी भागात मात्र, पावसाचे तुरळक थेंब पडून गेल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातही ठरावीक ठिकाणीच पाऊस झाला. शहराजवळील पिसादेवी भागात पाऊस झाला. मात्र, आडगाव बुद्रुकसह निपाणी, आडूळ आदी भागात पाऊस नसल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची शेतात शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे नुकसान झाले. फळबागांचे सुद्धा नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे वीज गुल झाली. ११ मे ही लग्नाची मोठी तिथी असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात मंगल कार्याचे कार्यक्रम होते. अवकाळी पावसाचा त्यालाही फटका बसला. हिंगोली, वसमत, सेनगाव परिसरात या अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांसह लग्नघरातील कार्यक्रमांना झळ पोहोचली आहे.
लातूरात शहर व परिसरात रविवारी दुपारी प्रचंड मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागातील फळबागांना मोठा फटका बसला. वादळवाऱ्याने आंब्याची मोठी गळ झाली आहे. दुपारनंतर आकाशात ढग जमून आल्याने आणि वारेही जोरात वाहू लागल्याने वीज प्रवाह खंडित झाला होता. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानेही लातूर, नांदेड, बीड व हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असेही केंद्राने म्हटले आहे.
वीज पडून दोघांचा मृत्यू
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सोयगाव व लातूर जिल्ह्यातील हरंगूळ खुर्द येथे मिळून दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. सोयगाव येथील शेतमजूर दिगंबर गायकवाड (वय ५९) व हरंगूळ खुर्द येथील तरुण राहुल चंद्रकांत जाधव (वय २२) यांचा मृत्यू झाला. तर सुगाव येथे मोहसीन सत्तार पठाण यांच्या शेतातील म्हैसही वीज पडून दगावल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारा घडली. मजुराच्या मृत्यूप्रकरणी तहसीलदारांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी येथील अनंता घाटे यांचा बैल दगावला.