SC NCP Hearing Updates, 09 October 2023 : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज दिवसभरात आपण याविषयीच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. त्याचबरोबर इस्रायल आणि हमासमधील युद्धावरही आपलं लक्ष असेल.
Mumbai Maharashtra Live News Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग टोल नाक्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अचानक आलेल्या मनसे कार्यकर्त्यांमुळे टोल नाक्यावरील कर्मचारी गोंधळले.
पिंपरी- चिंचवडमधील गॅस रिफिलिंग करताना झालेल्या स्फोटावरून आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पोलिसांवर चांगले संतापले. तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत तंबी दिली आहे.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार तर्फे आधारभूत किमान धान खरेदी योजना मुख्य अभिकर्ता महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ तथा उपअभिकर्ता आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, धान खरेदी करीत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात म्हणजेच गोंदियात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह सुमारे ३०९ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
धुळे: दिल्लीहून मुंबईकडे बेकायदेशीरपणे होणारी गुटख्याची वाहतूक धुळे पोलिसांनी रोखली असून कंटेनरसह ४८ लाख ४३ हजार ४४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील आज नाशिकच्या येवला शहरात येणार आहेत. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यासाठी आणलेल्या जेसीबीचा येवल्यात अपघात झाला आहे. जेसीबीचा हायड्रा अचानक खाली आल्याने हा अपघात झाल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने प्रसिद्ध केली आहे. जेसीबीच्या अपघातात तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, जखमींना जवळच्याच शांतीपुष्प रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
धुळे: घर रिकामे करून हवे असल्यास पाच लाख रुपये द्यावेत, अन्यथा ॲट्राॅसिटी विरोधी कायद्याने गुन्हा दाखल करू, अशी धमकी भाडेकरुंनी दिल्याने शहराजवळील मोहाडी उपनगरात घरमालकाने गळफास घेतला.
पनवेल: बृहन्मुंबई पोलीस सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार स्वयंविकास पॅनेलकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी झालेल्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणूकीचा निकाल रविवारी सायंकाळी खारघर येथील एस. सी. पाटील महाविद्यालयात जाहीर झाला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड शहरातील अवैधरित्या गॅस रिफ्लिंग करणाऱ्या टोळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अगोदर देखील गॅस रिफ्लिंग करताना काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या.
हा कार्यक्रम केंद्र, राज्य सरकारच्या भूमिका, धोरणे आणि नागरिकांमध्ये गैरसमज पसरवित असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी डोंबिवली, कल्याणमधील या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सरकता जिना मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. उद्वाहन दर दोन दिवसाआड बंद पडते.
इंडीया बूल्सचा हा महागृहनिर्माण प्रकल्प असून यामध्ये ३२०० सदनिका आहेत. ३२ मजल्यांच्या सतरा इमारतींमध्ये हे रहिवाशी राहतात.
जळगाव: चाळीसगाव येथील रेल्वेस्थानकाजवळील मालधक्का भागात मोटारीतून नऊ गोण्यांमधील सुमारे १८ लाख २ हजार ४०० रुपये किमतीची अफूची बोंडे व बोंडाचा चुरा, तसेच १० लाखांची मोटार मिळून सुमारे २८ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडण्यासाठी राज्यात तिसऱ्या आघाडीला भाजप बळ देत असून त्याविरोधात ‘इंडिया’कडून रणनिती निश्चित केली जात असल्याची माहिती या घडामोडींशी निगडीत सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेन की राष्ट्रवादी कोणाची आहे. राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच आहे, असं म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा की अजित पवार गटाचा यावर सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
पुणे : पुणे विमानतळावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) विमानतळावर उपलब्ध नव्हता. याबाबत हवाई वाहतूकतज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि विमानतळावर एईडी बसविण्यात आला.
सर्व सामान्य माणसांचे जगण्याचे प्रश्न फक्त दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींपुरतेच मर्यादित नसून ते त्या पलिकडचेही आहेत याचा प्रत्यय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनता दरबारात रविवारी आला.
महाविद्यालयातील शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखल अशा विविध स्वरूपाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र, ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे बनवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
शहरातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या श्रेयावरून चढाओढ सुरू झाली आहे. रुग्णालयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजप नेते करीत असून रुग्णालयासाठी निधी व पदे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातच मंजूर झाल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केला आहे.
जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून आतापर्यंत १०३ प्रकरणांचा उलगडा केला. जिल्ह्यातील एका प्रकरणात अकोट येथील मुलगी मुंबईमध्ये आढळून आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादंवि तसेच महिला, मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्यात येतो.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गोरेगावमधील उन्नत नगर येथील ‘जय भवानी’ इमारत दुर्घटनेनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला जाग आली आहे. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झोपु योजनेतील सर्व इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षा समितीने फुटलेला पेपर काल एक्स वर जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. फडणवीस मंत्री असलेल्या खात्याचा पुन्हा एकदा पेपर फुटला आहे. ते गृहमंत्री आहेत तर मुंबई पोलिस भरतीचा पेपर फुटला होता.
नीट पदवीधर २०२४ परीक्षेसाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अभ्यासक्रम जाहीर केला आहे. अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड कडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर हा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोदा गावात मैत्रीला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. फक्त ६० रुपयांच्या उसनवारी वरून झालेल्या वादाची परिणीती अशी की मित्रानेच गळा आवळून खून केला.
“…तर सर्वोच्च न्यायालय विधीमंडळाच्या कामात हस्तक्षेप करणार नाही”, राहुल नार्वेकरांचं वक्तव्य
शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत, असा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. याप्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, ठाकरे गटाच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे की संविधानिक शिस्त पाळली जाईल आणि ती पाळायला पाहिजे. संविधानाप्रमाणे आपलं विधीमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ या तिन्ही समान आहेत. यामध्ये कोणाचंही कोणावरही वर्चस्व नाही. त्यामुळे तिन्ही संस्था आपल्या कार्यक्षेत्रात राहून काम करत असतात. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या याचिकांवर निर्णय घेईल. एखादा निर्णय जर नियमबाह्य असेल, घटनाबाह्य असेल तर सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. परंतु तसं काही नसेल तर सर्वोच्च न्यायालय इतर संस्थांच्या कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही.