Maharashtra CM Oath-Taking Event 2024 Shivsena Balaji Kalyankar Remark : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर, शनिवारी (२३ नोव्हेंबर) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. महायुतीला २८८ पैकी २३६ जागांवर विजय मिळाला आहे. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंतच आहे. तत्पूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत नवं सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. त्यामुळे महायुती २६ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी आयोजित केला जाणार असल्याची चर्चा

भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल या पक्षाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. दरम्यान, अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत की मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होईल.

हे ही वाचा >> Video: लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेर यांनी सांगितली महायुतीच्या विजयाची ‘रेसिपी’!

बालाजी कल्याणकर यांनी काय सांगितलं?

त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मुंबईत बैठक बोलावली आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील आमदार तातडीने मुंबईत पोहोचावेत यासाठी त्यांनी आमदारांना आणण्यासाठी विशेष विमानं पाठवल्याचं कल्याणकर यांनी सांगितलं. शिवसेनेचे नांदेडमधील तीन आमदार मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज मुंबईत या आमदारांची बैठक होणार आहे. दरम्यान, बालाजी कल्याणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आम्ही शिवसेनेचे नांदेडमधील तिन्ही आमदार मुंबईला जात आहोत”.

बालाजी कल्याणकर म्हणाले, “हदगावचे आमदार बाबूराव कदम-कोहळीकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके आणि मी तात्काळ मुंबईसाठी रवाना होत आहे. सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. तत्पूर्वी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde new government maharashtra cm oath taking balaji kalyankar remark asc