कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिली, तर मी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलनस्थळी रविवारी बोलून दाखवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टींवर केला. या आरोपाला उत्तर देताना शेट्टी म्हणाले कि, दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी चळवळीवर गरळ ओकण्याचे व शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचे काम आमदार आवाडे करत आहेत.

हेही वाचा : कोल्हापूर, इचलकरंजीतील नेत्यांना सणासुदीत जल दिलासा; दुसऱ्या लढ्याचे आव्हान

जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, हे मी नाकारणार नाही. मात्र आमदार आवाडे भीती दाखवितात अशी परिस्थिती नसून जिल्ह्यातील धरणामध्ये गेल्या वर्षी असणारा पाणीसाठा व आजच्या दिवशी असणारा पाणीसाठा याची परिस्थती पाहिल्यास जर व्यवस्थित व काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर मे अखेरपर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो. मात्र राज्यकर्त्यांनी सरकारमध्ये असलेला आपला अधिकार वापरून शेतकऱ्यांचा काटा काढायचे ठरवले आहे, या सुडापोटी धरणामध्ये पाणीसाठा असतानाही धरणातून पाणी न सोडणे व कृषी पंपांचा विद्युत पुरवठा खंडीत करणे, यांसारखे प्रकार होऊ लागले आहेत. यामुळे मी ऊस परिषदेमध्येच शेतकऱ्यांना सांगितले आहे की ज्वारी व गव्हाचे दर वाढू लागल्याने शेतकऱ्यांनी ऊसाचे क्षेत्र कमी करून गहू व ज्वारीचे पिक घ्यावे.

हेही वाचा : कोल्हापूर : ऊस दराचा वाद राजकीय वळणावर; कारखानदार – शेतकरी नेत्यांतील संवाद संपला

आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने खताचे दर भरमसाठ वाढविले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेले पाहायचे आहेत. तुमचे मात्र तसे नाही. तुमची दुकानदारी चालविण्यासाठी तुम्ही राजकारण करता, असा टोला शेट्टी यांनी आवाडे यांना लगावला.

हेही वाचा : अखेर कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण; काळम्मावाडी नळपाणी योजनेचे पाणी शहरात पोहोचले

तर तुम्हीच व्हा खासदार!

यामुळे जर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही. तुम्ही अथवा तुमच्या मुलाला खुशाल लोकसभेसाठी ऊभे करा. याला माझा पाठिंबा असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur raju shetty said that he will not contest lok sabha polls 2024 css