लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी हातकणंगले मतदारसंघात लोकसभेचा उमेदवारी अर्ज बैलगाडीने जात दाखल केला. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

सकाळपासून दसरा चौक येथे कार्यकर्ते जमत होते. एकच गट्टी राजू शेट्टी अशा घोषणा घेत आसूड ओढला जात होता. राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, जयंत पाटील आणि सतेज पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली. खोक्याचा बाजार करणारी झुंड आणि कारखानदार हे माझ्या विरोधात उभे आहेत. माझ्याकडे सर्वसामान्य माणसे, विचारवंत असल्याने विजयाची खात्री आहे.

आणखी वाचा-कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन

अपक्ष निवडणूक लढत असल्याचा उल्लेख करून शेट्टी म्हणाले, त्यावरून मी एकटा उरलो आहे. माझ्यामागे कोणी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडे होत आहे.जमलेली गर्दी हे त्याला सामान्य नागरिकांनी दिलेले उत्तर आहे. ते नुसते आलेले नाहीत तर मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत घेऊन आले आहेत. देशात निवडणूक घोटाळा गाजत आहे. पण हेच माझे निवडणूक रोखे आहेत. शेतकऱ्यांच्या वर कोणी अन्याय करत असतील त्यांना आम्ही उत्तर देऊ.

आणखी वाचा-कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय

सामान्यांना संधी

दरम्यान, पांढरी – हिरव्या रंगाचे झेंडे घेतलेले आणि टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यलयाकडे निघाले. एकीकडे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पण शेट्टी यांचा अर्ज भरण्यासाठी सामान्य शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात मोठी गर्दी केल्याने रस्ते फुलून गेले होते. अर्ज भरताना नेत्यांना टाळुन लोकवर्गणीद्वारे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी प्रज्ञा घाटणे, शेतकरी बाळासाहेब कांबळे, कामगार बाबासाहेब कारंडे, हमीभाव शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय समनव्यक व्ही. एम. सिंग हे सोबत होते.