India vs Australia 3rd T20: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानचा मोठा विक्रम मोडू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह ‘मेन इन ब्लू’ने सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आता भारतीय संघ सामना जिंकताच हा एक नवीन विक्रम आपल्या नावावर करेल. तसेच, या सामन्यात विजय मिळवताच ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका देखील जिंकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने सर्वाधिक १३५ विजयांची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात जेव्हा भारतीय संघ गुवाहाटीच्या बारसापारा मैदानावर उतरेल तेव्हा पाकिस्तानच्या या विक्रमावरही नजरा असतील. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड क्रिकेट स्टेडियमवर रविवारी भारताने दुसरा टी-२० सामना ४४ धावांच्या फरकाने जिंकला. या विजयासह त्याने पाकिस्तानच्या टी-२० विक्रमाची बरोबरी केली. आता फक्त एक सामना जिंकून भारतीय संघ हा इतिहास रचू शकतो.

टी-२० फॉरमॅटमध्ये भारताने केली पाकिस्तानच्या विश्वविक्रमाची बरोबरी

भारताने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकूण २११ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा नुकताच भारताचा १३५वा विजय होता. त्याच वेळी, पाकिस्तानने आतापर्यंत २२६ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनीही १३५ विजय नोंदवले आहेत. भारतीय संघाने पाकिस्तानचा हा विक्रम सर्वात कमी सामन्यांमध्ये गाठला आहे. जर भारताने गुवाहाटी येथे होणारा सामना जिंकला तर ते पाकिस्तानपेक्षा कमी सामन्यांमध्ये हा विक्रम मागे टाकतील. याशिवाय या विजयासह भारत मालिकेवरही नाव कोरेल.

हेही वाचा: Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाण्याची पीसीबीला भीती; म्हणाले, “भारत जर पाकिस्तानात आला नाही तर…”

भारत vs ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील भारताची कामगिरी

ग्रीनफील्ड स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार अँड कंपनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये यशस्वी जैस्वाल (५३), ऋतुराज गायकवाड (५८) आणि इशान किशन (५२) यांनी अर्धशतके झळकावली. तीन अर्धशतके आणि रिंकू सिंगच्या शेवटच्या षटकातील आक्रमक खेळीमुळे संघाने २३६ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर रोखले आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

हेही वाचा: IPL 2024: आयपीएल २०२४च्या हंगामात कोण असेल मुंबई इंडियन्सचा कर्णधार, रोहित शर्मा की हार्दिक पंड्या?

कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८० धावांची शानदार खेळी केली. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा अशी कामगिरी करता आली नाही. याशिवाय दुसऱ्या सामन्यात रिंकू सिंगने ९ चेंडूत ३४४च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने ३१ धावा केल्या. त्यानंतर प्रसिध कृष्णाच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमणानेही आपले काम चोख बजावले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus will india break pakistans unique record of most t20 wins find out avw