Bishan Singh Bedi Death: भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. बेदी यांनी भारतासाठी एकूण ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने २७३ विकेट्स घेतल्या होत्या. भारतीय कसोटी इतिहासातील सर्वोत्तम फिरकीपटूंमध्ये बेदी यांची गणना केली जाते. त्याने देशासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते. बिशन सिंग बेदी यांच्या मुलाचे नाव अंगद बेदी आणि सुनेचे नाव नेहा धुपिया आहे. हे दोघेही भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेले आहेत. बिशन सिंग बेदी यांच्या निधनानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्वीटरवर भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय शाह यांनी बिशन सिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहिली असून ते म्हणाले की, “बिशनसिंग बेदी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख खूप झाले. भारतीय क्रिकेटने आज एक आयकॉन गमावला आहे. बेदी सरांनी खऱ्या अर्थाने एका नव्या क्रिकेटच्या युगाची व्याख्या लिहिली आहे. एक जादुई फिरकी गोलंदाज म्हणून आपल्या कौशल्याने त्यांनी अमिट छाप सोडली. या कठीण काळातून सावरण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांना बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या संवेदना त्यांच्या परिवाराबरोबर आहेत.”

भारताच्या प्रसिद्ध फिरकी चौकडीचा भाग होते

बेदी यांनी १९६६ ते १९७९ या काळात भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले. ते भारताच्या प्रसिद्ध फिरकी चौकडीचा एक भाग होते. त्यांच्याशिवाय, त्यात इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर होते. चौघांनी मिळून २३१ कसोटी सामने खेळले आणि त्यात ८५३ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली

बेदी यांनी १९६९-७० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत एका डावात ९८ धावांत सात विकेट्स घेत विक्रम केला होता. ही त्यांची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याच वेळी, जर आपण सामन्याबद्दल बोललो तर, १९९७-७८ मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९४ धावांत एकूण १० विकेट्स घेतल्या होत्या. १९७६ मध्ये कानपूर कसोटीत त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीतील एकमेव अर्धशतक झळकावले होते.

भारतीय संघाचे नेतृत्वही केले

बिशनसिंग बेदी यांनाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १९७६ मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. महान क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी बेदी यांना कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार म्हणून त्यांचा पहिला विजय १९७६च्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता. यानंतर, मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत ३-२ आणि पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत २-०ने पराभूत झाल्यानंतर त्यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्यांच्यानंतर सुनील गावसकर कर्णधार झाले. त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांमध्ये २६६ विकेट्स घेतल्या. त्याने १५ वेळा एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि एकदा सामन्यात १० विकेट्सही घेतल्या. त्याचबरोबर त्याने १० एकदिवसीय सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias great spinner bishan singh bedi passes away jai shahs sentiments after bishan singh bedis demise avw